मेढा – जावळी | सोमनाथ साखरे
निर्भीडसत्ता न्यूज –
मेढ्यात विजवितरण कार्यालयावर जावलीकरांनी घेराव घालून व वाढीव विजबिले दुरुस्त करून द्यावी व उपअभियंता अमोल तावरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशा घोषणा देत भर पावसात अनोखे आंदोलन जावलीकरांच्या वतीने करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी वीज अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना भर पावसात दोन तास उभे करण्याचे शासन केले. त्यामुळे या अनोख्या अंदोलनाची चर्चा जोरदार ऐकायला मिळत होती.
जावली तालुक्यातील वीज वितरण कार्यालयाच्या अधिकांऱ्याचा निषेध असो, विजवितरण कंपनीचा निषेध असो, अशा जोरदार घोषणा देत तालुक्यातील जनतेने वेण्णा चौकातून मोर्चाला प्रारंभ केला.
विज वितरण कंपनीच्या अन्यायकारक व चुकीच्या वाढीव वीज बिलांचा निषेध करण्यासाठी,जावली तालुक्यातील नादुरूस्त मीटरचा फटका ग्राहकांना बसत असून ते तात्काळ नवीन मीटर बसविण्यासाठी, शेतीपंप व घरगुती वीज कनेक्शनसाठी डिपाॅजीट भरूनही तीन वर्ष कनेक्शन दिले जात नाही.चुकीची वाढीव बीले तात्काळ दुरूस्त करणेसाठी, गंजलेले पोल, तुटलेल्या डी.पी.बाहेर पडलेल्या उघड्या वायर यांची तातडीने दुरूस्ती व्हावी, व वांरवार खंडीत होणारा वीजपुरवठा थांबवून होणारे नुकसान टाळणेसाठी, तसेेच जावलीकरांना तास न तास ताटकळत ठेवणार्या व वयोवृध्द व महिलांशी ऊध्दट वागणार्या अधिकार्यांना जाब विचारण्यासाठी हे अंदोलन करण्यात आले होते.
जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनता डोंगर कपारीतून येत असून त्यांच्यावर अन्याय होत असूनसुध्दा संबधित अधिकारी उध्दट प्रकारची उत्तरे देवून माता भगिनींना अपमानास्पद वागणूक देत असल्याने त्याना तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढण्यात आला होता तो तात्काळ पुर्वीच्या ठिकाणी कार्यालयात बसवण्यात यावा.
वरील सर्व मागण्या २ ऑक्टोंबर गांधी जयंतीपर्यंत मान्य न झाल्यास आधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेचा जाब विचारण्यासाठी जावलीकर पुन्हा रस्त्यावर उतरतील. संबधित अधिकाऱ्यांंनी गांभीर्यपूर्वक विचार केला नाही तर घडणाऱ्या परिणामाला विज वितरण कार्यालयाचे अधिकारी जबाबदार राहतील.असा इशारा जावलीकर व व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी आंदोलकर्त्यांना शांततेचे आवाहन करून वाईचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारीरामकृष्ण शिंदे यांनी जावलीकरांनी निवेदनाद्वारे दिलेल्या मागणीचा जाणीवपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले आहे.तसेच जिल्हा नियोजनच्या माध्यमातून ३५ लाखांचा निधी जावली तालुक्यात गजंलेले पोल,धोकादायक पोल याकरिता मंजूर झाले असून पावसाचे प्रमाण कमी झाल्यानतंर तेही काम मार्गी लावले जाईल. असे वरिष्ठ अधिकारी यांनी आश्वासित केल्यानंतर व तात्काळ छ. शिवाजी महाराजांचा फोटो कार्यालयात लावल्यानंतर एका अनोख्या आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी आंदोलन कर्त्यांकडून प्रशासनाची कोणत्याही प्रकारची हानी होवू नये म्हणून सपोनि जीवन माने यांंच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.