निर्भीडसत्ता न्यूज –
महसूल विभाग लोकाभिमुख होत असून ई फेरफार प्रणालीमध्ये प्रत्येकाने आपापली जबाबदारी समजून काम करावे आणि शासनाची प्रतिमा उज्ज्वल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
अल्पबचत भवन येथे पुणे जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी यांच्यासाठी ई फेरफार प्रणालीची विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, राज्य समन्वयक रामदास जगताप आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मार्गदर्शन करतांना महसूल विभागाचे महत्त्व विशद केले. मौर्य, गुप्त, अकबर आदींच्या काळापासून महसूल विभागाचे स्थान अबाधित आहे. या साम्राज्यांचा विस्तार महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवरच झाला. आजही महसूल विभाग महत्त्वाचा आहे. तलाठ्यांचे महत्त्व सांगतांना जिल्हाधिकारी राम म्हणाले, शासकीय निर्णयांची अंमलबजावणी करणारा, शेवटच्या घटकांपर्यंत नेणारा तलाठी हा महत्त्वाचा घटक आहे. ई फेरफार प्रणालीमध्ये तलाठ्यांचीही खूप मोठी जबाबदारी आहे. सर्व संबंधितांनी आपापली जबाबदारी पार पाडून या प्रणालीमध्ये पुणे जिल्हा प्रथम क्रमांकावर राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत. ई फेरफार प्रणालीमध्ये बिनचूक आणि कार्यक्षम असे पायाभूत काम झाल्यास भविष्यात चुका होणार नाही, असे नमूद करुन जिल्हाधिकारी राम यांनी लवकरच तहसिलदार आणि प्रांताधिकारी स्तरावरील कामांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले.
बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असतांना पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये उत्तम काम केले होते. महसूल विभागाने या कामात पुढाकार घेतल्यामुळेच हे शक्य झाले. शेतक-यांना वेळेवर सात-बारा उतारे उपलब्ध करुन देणे, आवश्यक तेथे शिबीरे घेणे या कामांमुळे पीक विमा योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाली, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
महसूल अधिकारी-कर्मचा-यांनी शासकीय काम करीत असतांना स्वत:चे आरोग्य, कुटुंबाची काळजी, वैयक्तिक कलागुणांना वाव, सर्जनशीलता याबाबत दक्ष रहावे, असे आवाहन करुन सकारात्मक उर्जेबाबत कुठलीही तडजोड करु नये, असे सांगितले. दरवर्षी अधिकारी-कर्मचा-यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादन केली.
राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी ई फेरफार प्रणालीच्या काही आज्ञावलींमध्ये बदल झाला असून त्याबाबत संबंधित प्रत्येकाला माहिती व्हावी, मनात कोणत्याही शंका राहू नये, यासाठी कार्यशाळा आयोजन करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले. संगणकीकृत सात-बारा त्यानंतर ऑनलाईन सात-बारा आता डिजीटल सात-बारा ही या प्रकल्पाची प्रगती असून यामध्ये भविष्यात आमुलाग्र बदल होणार असल्याचे ते म्हणाले. पुणे जिल्ह्यातील जनतेला अचूक संगणकीकृत सातबारा व खाते उतारा या सह डिजिटल स्वाक्षरीत सातबारा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधितांनी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी कार्यशाळेतील ज्ञानाच्या आधारे जिल्ह्यात ई फेरफार प्रणालीमध्ये अव्वल दर्जाचे काम होऊन पुणे जिल्हा राज्यात एक क्रमांकावर येईल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यशाळेस पुणे जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार, प्रांताधिकारी उपस्थित होते.