निर्भीड न्यूज –
दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पाणी आणि अन्न वेळेवर मिळत नसल्याने दुष्काळग्रस्तांचे जगणे अवघड झाले आहे. या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. अशांपैकीच एक म्हणजे चेतन महाजन होय. एका छोटेखानी हॉटेलमध्ये आठवड्यातून एकदा केवळ दहा रुपयांत जेवण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून मिळालेली रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.
दुष्काळाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळून निघाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी भागांतील हजारो गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी नसल्याने या भागातील सर्वांचे आयुष्य वाळवंटासारखे झाले आहे. वाढत्या तापमानाने दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. धान्य आणि पाण्याची टंचाई यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अशा दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, संघटना, व्यक्ती पुढे येत आहेत.
रहाटणी गावातील शिवाजी चौकात असलेल्या हॉटेल न्यू आकाश येथे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. दर शुक्रवारी केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण देऊन हे दहा रुपये दुष्काळग्रस्तांच्या निधीत जमा करण्यात येत आहेत. याला नागरिकांकडून आणि ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भात आणि सांभार असे जेवण असून, दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून ग्राहकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील चेतन महाजन गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. रहाटणी येथे 2010 मध्ये भाडे तत्वावर गाळा घेऊन हॉटेल न्यू अशोक सुरू केले. जेवणासह कोल्ड्रींक्स वगैरे सेवा या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
महाजन या उपक्रमाबाबत सांगतात की, महाराष्ट्रातील दुष्काळाची चर्चा सुरुवातीपासूनच सुरू होती. 2015 मध्ये पाऊस पुरेसा न झाल्याने यंदा दुष्काळाची तिव्रता अधिक राहील, असे वृत्त टीव्ही चॅनेल आणि वर्तमानपत्रांतून पाहावयास आणि वाचावयास मिळाली. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना आपणही मदत करावी, असे ठरविले. त्यातूनच केवळ दहा रुपयांत पोटभर भात आणि सांभार देण्याचे ठरले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 12 हजार रुपये जमा झाले आहेत. अजून काही दिवस या उपक्रमातून रक्कम जमवून ती सर्व रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्यात येईल. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनकडे ही रक्कम सोपविण्यात येईल. जेणेकरून दुष्काळपर्यंत तो मदत निधी पोचेल.