निर्भीडसत्ता न्यूज –
गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर उघडपणे टीका करणारे भाजपाचे काटोल येथील आमदार आशिष देशमुख यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ईमेल आणि फॅक्सद्वारे पाठविला. उद्या बुधवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना प्रत्यक्ष भेटून ते त्यांना राजीनामा पत्र सुपूर्त करतील. काँग्रेसचे माजी मंत्री रणजीत देशमुख यांचे ते चिरंजीव असून वडिलांप्रमाणेच ते काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेण्याची शक्यता आहे.
आशिष देशमुख हे नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपामध्ये नाराज आहेत. अनेकदा त्यांनी उघडपणे भाजपाच्या धोरणांवर टीका केली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपामधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आज अखेर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून, आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी सेवाग्रामच्या दौऱ्यावर आहेत. त्याच्या उपस्थितीत ते काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.