निर्भीडसत्ता न्यूज –
पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेचा पहिला आमदार 1995 मध्ये जावळी तालुक्याने दिला होता. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या जावळी तालुक्याने पुन्हा इतिहास घडवण्यासाठी एकत्र येवून आपली ताकद दाखवून द्यावी आणि शिवसेनेचा आमदार विधानभेत पाठवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी केले.
शिवसेनेचा तालुका मेळावा नुकताच केडंबे येथे झाला. त्यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख एस. एस. पारटे, जिल्हा प्रमुख हर्षल कदम, चंद्रकांत जाधव, तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, विद्याथ सेना प्रमुख सचिन करंजेकर, सहसंपर्क प्रमुख सखाराम साळुंखे, सचिन शेलार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ओंबळे म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून जावळीतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या शौर्याची प्रेरणा घेवून व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागर्दशर्नाखाली जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांचे नेहमी सहकार्य मिळत आहे. जावळीचा विकास होण्यासाठी भगवा खांद्यावर घेवून शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत अजिंक्यतारा व प्रतापगडाच्या साक्षीने भगवा फडकविण्यासाठी जनतेने शिवसेनेला साथ द्यावी, असे भावनिक आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही विधानसभेला सेनेने ओंबळे यांना उमेदवारी देवून त्यांच्या प्रामाणिक पक्षनिष्ठेचा सन्मान करावा, अशी मागणीही केली.
दरम्यान, एकनाथ ओंबळे यांचा शिवसैनिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवराम धनावडे, गणपत ओंबळे, आदिनाथ ओंबळे, दीपक ओंबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कायर्क्रमास प्रशांत जुनघरे, तुकाराम साळुंखे, बाजीराव जंगम, राजेंद्र ओंबळे, रामचंद्र ओंबळे, सुनीला ओंबळे, जिल्ह्यातील शिवसैनिक, मुंबईकर ग्रामस्थ, केडंबे ग्रामस्थ उपस्थित होते.