निर्भीडसत्ता न्यूज –
92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लेखिका अरुणा ढेरे यांच्या नावावर रविवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमत झाले. संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळालेल्या ढेरे या पाचव्या महिला लेखिका ठरल्या आहेत. यावर्षीपासून निवडणुकीऐवजी एकमताने अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. महामंडळाच्या घटक संस्था असलेल्या मुंबई, पुणे, मराठवाडा, छत्तीसगड, इंदौर, कर्नाटक, गोवा, औरंगाबाद, बडोदा, नागपूर येथील 20 सदस्य या बैठकीला उपस्थित होते. संमेलनाध्यक्षासाठी ढेरे यांच्यासोबत प्रभा गणोरकर, डॉ. भालचंद्र नेमाडे, ना.धो. महानोर, प्रेमानंद गज्वी यांच्या नावात चुरस होती. साहित्य संमेलन पोस्टर ग्राउंडवर जानेवारी महिन्याच्या पहिल्या वा दुसर्या आठवड्यात होणार असल्याचे नियोजन महामंडळाने केले आहेत. अमरावतीच्या ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांचे नावही अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. प्रभा गणोरकर यांनी याआधीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावून पाहिले होते.
यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला होता. त्यानुसार चार घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून प्रत्येकी एक आणि विद्यमान संमेलनाध्यक्षांकडून एक अशी नावे मागवण्यात आली होती. यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेने नावे माघारी घेतल्याने त्या नावांचा विचार केला गेला नाही. इतर नावांबाबत चर्चा झाल्यावर बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे.