निर्भीडसत्ता न्यूज –
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शास्तीकर अंमलबजावणी चालू झाली. सर्वसामान्य पिंपरी-चिंचवडकरांवर हा शास्तीकर लादण्याचे पाप देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, असा आरोप महापालिकेतील सत्तारूढ पक्ष नेता एकनाथ पवार यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे पाप धुवून काढण्याचे काम भाजप सरकार करत आहे, असा पलटवारही त्यांनी केला आहे.
शास्तीकरावरून विरोधकांच्या सुरू असलेल्या आरोपांवर सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी टीका केली आहे. विरोधक पंधरा दिवसांचे भांडवल करत असले, तरी शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले. 15 दिवसात शास्तीकराबाबत निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात आश्वासन दिले. त्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस, सेना, मनसेसह सामाजिक संस्थांनी काऊंट डाऊन आंदोन सुरू केले आहे. तसेच, 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. त्यावरून भाजपातर्फे एकनाथ पवार यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
पवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर काऊंटडाऊन करणारे विरोधक शास्तीकराच्या प्रश्नावरून यापूर्वी झोपले होते का ? सरकारने 600 चौरस फुटांच्या बांधकामांना माफी व 1 हजार चौरस फुटांसाठी 50 टक्के माफी दिली. नागरिकांना शास्तीकरापासून आणखी दिलासा देण्याची विनंती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केले.
प्रशासकीय कारभारात वेळेत कामे होत नसतात. मात्र, शास्तीकराबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. दोन-चार दिवस इकडे तिकडे झाले, तरी भाजप नागरिकांना दिलासा देणार आहे. राष्ट्रवादीने शास्तीकरापासून नागरिकांची सुटका करण्यासाठी काय केले, हे सांगावे. त्यांनीच शास्तीकर लादला असून ते पाप धुवून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अशाच पद्धतीने प्रलंबित ठेवून आघाडी सरकारने नागरिकांच्या भावनांशी खेळ केला होता. आठ दिवसांत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंचवड येथील एका कार्यक्रमात दिले होते. मात्र तरीही आघाडी सरकारकडून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सुटला नाही. भाजपा सरकारने शहरातील तसेच राज्यातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सोडविला. अशाच पद्धतीने शास्तीकराचा प्रश्न सोडविण्यात आघाडी सरकार अपयशी ठरले. मात्र भाजपा सरकार शास्तीकराचा प्रश्न सोडविणार असून, नागरिकांना त्यापासून दिलासा देणार आहे. त्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असून, लवकरच त्याबाबत निर्णय होईल, असेही पवार यांनी सांगितले.