निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवडकरांचे प्रश्न सोडविण्यास पीएमपीएमएल व्यवस्थापन तत्परता दाखविता नाही. नेहमी पिंपरी-चिंचवडकरांना दुय्यम वागणूक दिली जाते. कर्मचा-यांचे प्रश्न सोडविले जात नाही. 40 टक्के देय रक्कम देऊनही सापत्नभावाची वागणूक दिली जाते. यामुळे ‘पीएमपीएमएल’चे विलगीकरण होऊन ‘पीसीएमटीची’ पुणर्स्थापना व्हावी, अशी महापौर राहूल जाधव यांची मागणी आहे.
यासंदर्भात महापौर जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसुध्दीस पत्रकही दिले आहे. महापौर म्हणाले की, ‘पीसीएमटी’ व ‘पीएमटी’ यांचे २००७ मध्ये एकत्रीकरण होऊन ‘पीएमपीएमएल’ची स्थापना झाली. कंपनीचा कारभार चालवण्यासाठी पुणे मनपा ६० टक्के आणि पिंपरी-चिंचवड मनपा ४० टक्के स्वहिस्सा अदा करतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘पीएमपीएमएल’ला ठरल्याप्रमाणे ४० टक्के रक्कम नियमितपणे अदा केली आहे.
दरम्यान, ‘पीएमपीएमएल’मधील कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. पूर्व ‘पीसीएमटी’ कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जात असल्याचे दिसून येते. ‘पीएमपीएमएल’ कंपनीची सेवा नागरिकांना व्यवस्थितपणे भेटत नाही. पिंपरी-चिंचवड शहरासाठी बसची संख्या अपुरी आहे. नेहमी जुन्या बसेस आढळून येतात. वेळेवर बस येत नसल्याने नागरिकांना कायम त्रासाला सामोरे जावे लागते. संचालक मंडळाची बैठक ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केली जात नाही. ‘पीएमपीएमएल’ कंपनीचे अधिकारी हे पिंपरी-चिंचवड मनपाचे नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांना सन्मानपुर्वक वागणूक देत नाहीत. त्यांच्या पत्रांना वेळेवर उत्तरे दिली जात नाहीत, अशी नाराजी महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केली.