औरंगाबाद : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सध्या सत्ताधाऱ्यांच्या गोटात सुरू आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे २८ फेब्रुवारी रोजी राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा बरखास्त करतील आणि लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील घेतल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने जोरदारपणे तयारीला लागा असे आदेश अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे.
त्यामुळे काही करून मतांचे विभाजन टाळा आणि भारतीय जनता पक्ष – शिवसेनेला पाडा,’ असे थेट आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केले. औरंगाबाद येथील राजीव गांधी स्टेडयमवर गुरुवारी काँग्रेस आयोजित जाहीर सभेत ते संवाद साधत होते. दरम्यान त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. तसेच अॅड. प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून ते म्हणाले की, ‘वंचित बहुजन आघाडीला माझी हात जोडून विनंती आहे की, भारतीय जनता पार्टीला मदत होईल, असे काही तुम्ही करू नका. त्यात केवळ तीस टक्के मतांवर भाजपचे सरकार देशात आलेले. त्यामुळे उर्वरित ७० टक्के मते आता काही करून एकत्र राहिली पाहिजेत.
दरम्यान प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी मी स्वतः प्रकाश आंबेडकर यांच्या घरी एकवेळा नव्हे, तर तब्बल ५ वेळा गेलो. कारण जागावाटप म्हणजे फार मोठी गोष्ट नाही. स्वत: प्रकाश आंबेडकर हे खासदार बनून लोकसभेत जावेत, ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. तसेच देशात काँग्रेस RSSच्या विरोधात काल होता, आज आहे आणि उद्याही राहील असे स्पष्ट केले.