रविवारी (दि. 31) पनवेल तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेण्यात आल्या. तळोजे मजकूर येथे प्रचाराची पहिली सभा झाली. या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते. यावेळी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौटमल, उपमहापौर विक्रांत पाटील, सल्लागार बाबनदादा पाटील, जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, सरचिटणीस अरुण बागल, रामदास पाटील, प्रल्हाद केणे, परेश पाटील, विनोद गरड, संतोष भोईर, बाळासाहेब पाटील, परेश ठाकूर, नगरसेवक संतोष भोईर, अरुण भगत, विक्रांत पाटील, रामदास शेवाळे आदी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे हेच यावेळी देखील विजयी होणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम सरकार देशात काम करत आहे. मागील पाच वर्षात संपुर्ण जगभरात भारताचा गौरव झाला आहे. एक जागरूक खासदार कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खासदार बारणे आहेत. देशाची घडी आणखी सुस्थितीत बसविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागून खासदार बारणे यांना विजयी करावे.”
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “खासदार म्हणून काम करत असताना सर्वसामान्यांशी नातं जोडण्याचं काम केलं आहे. मराठी माणूस दिल्लीत बोलत नाही, मराठी माणसाला दिल्लीच्या दरबारी आवाज नाही, असे आजपर्यंत बोलले जायचे. पण याला छेद देत पाच वर्षांच्या कालावधीत 1 हजार 110 प्रश्न उपस्थित केले. 289 वेळा देशाच्या संसदेत बोलून 20 टक्के खाजगी विधेयके मांडली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला सामर्थ्यशाली बनवलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे प्राबल्य आहे. चांगल्या उमेदवाराला मतदारांनी बळ द्यावे, असे आवाहन देखील खासदार बारणे यांनी केले.
“पनवेल मधून शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व संपले आहे. महायुतीची ताकद वाढत आहे. त्यामुळे पनवेल मधून महायुतीच्या उमेदवाराला एक लाख मतांची आघाडी मिळणार आहे”, असे बाबनदादा पाटील म्हणाले. “पनवेल मध्ये खासदार श्रीरंग बारणे हे ‘अर्जुन’ आहेत आणि त्यांचे सारथ्य करणारे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर ‘श्रीकृष्ण’ आहेत. हे दोघे मिळून पनवेलच्या विकासाचा रथ पुढे नेणार आहेत. त्यामुळे विकासपुरुषाला मत देऊन महायुतीला विजय मिळवून देण्याचे आश्वासन अरुण बागल यांनी दिले.