राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ
निर्भीडसत्ता न्यूज –
गेल्या पाच वर्षांत आमचा मित्र पक्ष भाजप आणि या पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर आजपर्यंत केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आणि निराधार होते. राजकीय हेतूने मी हे आरोप केले होते, अशी कबुली शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी (दि. ८) दिली. महापालिकेच्या कारभारावरही मी राजकीय हेतूनेच टिका केली होती. भाजप हा आमचा मित्र पक्ष असल्यामुळे यापुढील काळात आम्ही सर्वजण एकदिलाने काम करू. आमच्यात कोणतेही मतभेद होणार नाहीत, याची मी पुरेपूर काळजी घेईन. तसेच आमदार लक्ष्मण जगताप व भाजप पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच यापुढील माझी वाटचाल राहिल, असे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.
आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार गौतम चाबुकस्वार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी नगरसेविका उमा खापरे, माजी नगरसेवक अमर मूलचंदानी, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आदी उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले कि, २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या पाठबळामुळेच मला मावळ लोकसभा मतदारसंघातून खासदार होण्याची संधी मिळाली. भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या निःस्वार्थ कामांमुळे माझा विजय सोपा झाला. खासदार झाल्यानंतर मी भाजप आणि त्या पक्षाच्या नेतृत्वावर राजकीय द्वेषापोटी अनेक बिनबुडाचे आरोप केले आहेत. आम्ही केलेला हा आरोप राजकीय हेतूने प्रेरित होता.
भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर केलेले सर्व आरोप व टिका बिनबुडाचे होते. केवळ राजकीय हेतूने मी आरोप केले होते. आमदार जगताप यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन मी टिका करणे उचित नव्हते. भाजप पदाधिकाऱ्यांसोबतच्या सर्व मतभेदांना मूठमाती देऊन आम्ही सर्वजण एक नवीन सुरूवात करणार आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वजण एकदिलाने काम करून मावळ मतदारसंघात भगवा फडकवणार असल्याचे त्यांनी सांगितले.