निर्भीडसत्ता न्यूज ।
मतदानाला अवघे काही दिवस उरले असताना मावळ विधानसभा मतदार संघाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार बनत चालली आहे. विरोधी पक्षातील नाराजांना भाजपात झटपट प्रवेश मिळत आहे. वेगवेगळ्या कारणांनी भाजपात प्रवेश घेऊन आपले अस्तित्व टिकवू पाहणाऱ्यांनी लगोलग आपल्या विरोधकांवर “निष्ठा’ नामक अस्त्राचे वार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र मावळवासीय विकासकामे करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्यालाच निवडून आणणार, हेच राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीर सभांना होणारी गर्दी सिद्ध करते.
भाजपमधून डावलले गेलेल्या सुनिल शेळके यांनी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीत प्रवेश करून प्रचाराचा धडाका उडवून दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १५ वर्षे घालविल्यानंतर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले कात्रज दूध संघाचे संचालक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी मंगळवारी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. भाजपच्या प्रचार सभेत बोलताना नेवाळे यांनी निष्ठा आणि सामाजिक कार्य पैशांपुढे हरते, असा टोला अप्रत्यक्षपणे सुनील शेळके यांना हाणला. वास्तविक ही गोष्ट त्यांनाही लागू होते याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतो. राष्ट्रवादीत असताना विविध पदे उपभोगलेल्या नेवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसवरील ‘निष्ठा’ कशी आणि का गायब झाली? अशी कुजबुज सध्या मावळ परिसरात सुरु आहे.
शेळके यांच्याबाबत सगळ्यात महत्त्वाची बाब जनतेच्या लक्षात आली आहे, ती म्हणजे पूर्वीचा पक्ष सोडला तरी त्या पक्षाबाबत एकही अनुचित अथवा वाईट शब्द त्यांनी कधी काढला नाही. ते व्यक्तींवर टीका करतात, चुकीच्या धोरणांवर टीका करतात, पण पक्षाला त्यांनी कधी नावे ठेवली नाहीत. त्यांनी जनतेपासून काहीही लपवले नाही. लोकांच्या मदतीला धावून जाणारा, विकासकामांसाठी प्रसंगी पदरचे पैसे खर्च करून कामे करणारा स्वच्छ मनाचा नेता, अशीच त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये आहे. म्हणूनच त्यांच्या स्वागतासाठी गावागावातून आबालवृद्धांसह महिलवर्ग आणि तरुणाईही प्रचंड गर्दी करते. याउलट नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या बाळासाहेब नेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमधून जनताच हद्दपार करेल, अशी दर्पोक्ती केली आहे.
सुनिल शेळके यांनी अनेक वर्षे भाजपात घालविली आहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. परंतु, त्यांना उमेदवारी देताना डावलण्यात आले. मावळ तालुक्याच्या विकासाकरिता ही निवडणूक यंदा लढवायचीच, असा निश्चय केलेल्या शेळके यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतारण्याचीही तयारी ठेवली. मात्र, शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्याच्या अनुभवी नजरेने सुनील शेळके यांच्यातल्या तळमळीच्या आणि सच्च्या कार्यकर्त्याला हेरले आणि राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. जनसामान्यांचे हित आणि तालुक्याचा विकास हाच ध्यास घेतलेल्या सुनिल शेळकेंनी त्यांच्या कार्याला महत्त्व देऊन संधी देणाऱ्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आणि प्रचाराची राळ उडवून दिली. मावळ तालुक्यातील त्यांच्या प्रचार दौऱ्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालील वाळू सरकू लागली असल्याने मावळच्या कारभारी यंदा बदलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.