निर्भीडसत्ता न्यूज –
महाराष्ट्रात घटनेनुसार राज्य चालविणे अशक्य झाल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केंद्राकडे केली आहे. या संदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला जाईल. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे या संदर्भातला अहवाल पाठवला आहे. त्यामुळे रात्री साडेआठनंतर महाराष्ट्रात कधीही राष्ट्रपती राजवट लागू शकते. यासंदर्भातली शिफारस राज्यपालांनी केली आहे.
महाराष्ट्रात सत्तस्थापनेचा अभूतपूर्व घोळ निर्माण झाला आहे. भाजपाने सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिले. मात्र त्यांना हा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिले. मात्र राष्ट्रवादीने दोन दिवस वाढवून मिळण्याची मागणी राज्यपालांकडे केली. मात्र राज्यपालांनी मुदत वाढविण्यास असमर्थता दर्शवत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे.
राज्यपालांनी तसे पत्रच केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याची घोषणा केली जाऊ शकते. राज्यपालांच्या शिफारशीनंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा झाली. तसेच राज्यातील कायदा-सु्व्यवस्थेचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागविला आहे.
२४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल लागला. निकालामध्ये महायुतीला कौल मिळाला. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं अशी आग्रही भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे आमचं ठरलंय वरुन आमचं बिनसलंयपर्यंत हे दोन पक्ष आले. त्यानंतर भाजपाने शिवसेना सोबत येत नसल्याने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरु केली. मात्र शिवसेनेला जी वेळ देण्यात आली होती त्या वेळेत शिवसेनेलाही दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला मंगळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत सत्ता स्थापनेची मुदत देण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता दोन दिवस मुदत वाढविण्याची मागणी राज्यपालांकडे विनंती केली. मात्र राज्यपालांनी मुदत वाढविण्यास असमर्थता दर्शवत केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे.