पर्यावरण संवर्धन समितीचा महापालिकेकडे मागणी
निर्भीडसत्ता न्यूज ।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी दीड हजारपेक्षा अधिक झाडे कापली जाणार आहेत. त्या बदल्यास महापालिकेने शहरात किमान 25 हजार देशी झाडे शहरात लावावीत, अशी मागणी पर्यावण संवर्धन समितीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पालिकेस अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर शासनाने जागा दिली आहे. त्या जागेवर शासनाने अथवा स्थानिक वृक्षप्रेमी मंडळीने अनेक झाडे लावली आहेत. ग्लेरीसिरीयाची 1 हजार 127 झाडे व इतर काही विदेशी झाडे काढून टाकावी लागणार आहेत. त्यामुळे चिखली परिसरातील हरित पट्टा कमी होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी नक्कीच होणार आहे, असे पर्यावरण संवर्धन समितीने आता मान्य केले आहे. पूर्वी ती झाडे नसून केवळ झुडपे असल्याचा दावा समितीने केला होता.
झाडांची ही हानी पुन्हा भरून काढण्यासाठी अथवा टाळण्यासाठी पालिकेने गांभीर्याने प्रयत्न करावेत. दीड हजार झाडे तोडण्यापूर्वी त्वरित शहरात कमीत कमी 25 हजार झाडांची लागवड करावी. ही झाडे शहरातील नागरिकांच्या व सामाजिक संस्थांच्या सहभागाने लावावीत. त्यात पारदर्शीपणा नागरिकांना जाणवला पाहिजे. ही सर्व झाडे लावताना पर्यावरण पर्यावरण तज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासकांच्या मान्यतेने झाडांच्या जाती व प्रजाती निवडण्यात याव्यात, अशी सूचना समितीने केली आहे.
शहरासाठी पाण्याची गरज असून, जलशुद्धीकरण केंद्र अत्यावश्यक आहे. चिखलीत दुसरीकडे मोकळी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जलशुद्धीकरण उभारण्यास हरकत नसल्याचे समितीचे मत आहे.
……