निर्भीडसत्ता न्यूज ।
पुरुष प्रधान संस्कृती असलेला आपला देश अलिकडे स्त्री पुरुष समानतेचे धडे देत आहे. मात्र आजही कुटुंब नियोजनासाठी फक्त महिलांनाच पुढाकार घ्यावा लागत आहे. ‘छोटे कुटुंब सुखी कुटुंब’ या सारखी घोषवाक्ये देऊन लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या. मात्र याबाबत पुरुषांनी हात वर करत महिलांनाच पुढे केल्याचे चित्र दिसते. कुटुंब नियोजनासाठी स्त्री व पुरुष दोघांकरिता शस्त्रक्रिया आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये दोन वर्ष सात महिन्यांमध्ये अवघ्या 36 पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. यावरून पुरुष कुटुंब नियोजनाची जबाबदारीही स्वीकारण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
शहरामध्ये पुरुष नसबंदीचे प्रमाण आजही अत्यल्प आहे. गैरसमज, जनजागृतीचा अभाव यामुळे पुरुष नसबंदीसाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे. मागील दोन वर्ष सात महिन्यांत 2 हजार 542 महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे. तर फक्त 36 पुरुषांनी नसबंदी केली आहे. यावरून कुटुंब कल्याणची जबाबदारी आजही फक्त महिलाच पार पाडताना दिसत आहेत. कुटुंब नियोजन हा लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम समजला जातो. ‘हम दो हमारे दो, कुटुंब लहान सुख महान’ यावर नागरिकांनी भर दिला आहे. मात्र शस्त्रक्रियेसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने शहरच नव्हे तर संपूर्ण राज्यात नसबंदीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाचा सगळा भार महिलांवर असल्याचे स्पष्ट होते.
एक टक्काही सहभाग नाही
वायसीएम रुग्णालयात कुटुंब नियोजनासाठी एप्रिल 2018 ते मार्च 2019 या वर्षात 1600 स्त्री शस्त्रक्रिया झाल्या. तर त्या वर्षात फक्त सहा पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. 2018-19 या वर्षात 1690 स्त्रियांची तर फक्त 12 पुरुषांची शस्त्रक्रिया झाली. एप्रिल 2019 ते ऑक्टोबर 19 या सात महिन्यात 1065 स्त्रियांची व 8 पुरुषांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली. यावरून महिलांच्या तुलनेत कुटुंब नियोजनासाठी पुरुषांचा एक टक्का ही सहभाग नसल्याचे समोर
आले आहे.
फक्त पंधरा मिनिटे
वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत असलेल्या आमूलाग्र बदलामुळे या शस्त्रक्रिया सुलभ आणि वेदनारहित झाल्या आहेत. महिलांची शस्त्रक्रिया ही टाक्याची व बिनटाक्याची अशा दोन प्रकारची असते. टाक्याच्या शस्त्रक्रियेसाठी सात दिवस रुग्णालयात थांबावे लागते. तर बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसाठी एक दिवस थांबावे लागते. बिनटाक्याची शस्त्रक्रिया जास्त प्रमाणात होत असल्याची नोंद आहे.
पुरुषांना कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे लागतात. पुरुषाला शस्त्रक्रिया झाल्यानंतर फक्त एक दिवस आराम करावा लागतो. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संबंधित पुरुष सामान्य माणसासारखे नियमित जीवन जगू शकतो. लोकसंख्या नियंत्रणासाठी पुरुषांनीही पुढाकार घ्यावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. नसबंदी शस्त्रक्रिया केल्यानंतर संबंधिताकडे बीपीएल कार्ड असल्यास 600 रुपये मिळतात. तर ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल त्यांना 250 रुपये प्रोत्साहनपर निधी दिला जातो. आरोग्य विभागाकडून वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात असली तरी अद्यापही याबाबत पुरुष जागृत झाले नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. कुटुंब नियोजनासाठी महिलांच्या प्रमाणात पुरुषांचे प्रमाण वाढविण्याचे आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान आहे.