निर्भीडसत्ता न्यूज ।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची बदली करण्यात यावी. त्या कामाप्रती जबाबदार नाहीत, त्यांना कुठल्याही विषयाची माहिती मागितली तर त्या देत नाहीत. शिक्षण विभागामध्ये सध्या सर्व कारभार अनागोंदी सुरू आहे. त्याला अधिकारी ज्योत्स्ना शिंदे या जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांची बदली करावी, अशी मागणी महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जानेवारी महिन्याच्या महासभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. यावेळी शिक्षण विभागाच्या कामगिरीवर बोलताना नगरसेवकांनी ही मागणी केली. नगरसेवक राजू बनसोडे म्हणाले, शिक्षणाधिकारी आज सभागृहात उपस्थित नाहीत. मात्र त्या त्यांच्या कार्यालयातही कधीच उपस्थित नसतात. कोणताही विषय त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर नगरसेवकांना कधीच त्या सविस्तर माहिती देत नाहीत. त्यांना ताबडतोब फोन करून त्यांनी सभागृहात हजर राहण्याची सूचना करा. आम्हा नगरसेवकांना त्यांना माहिती विचारायची आहे. यावर बनसोडे यांनी आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत ज्योत्सना शिंदे सभागृहात येणार नाही, तोपर्यंत खाली बसणार नसल्याची भूमिका घेतली. महापौरांनी त्या आजारी असल्याचे सांगितले. त्यावर बनसोडे यांनी आक्षेप घेत त्या आजारी आहेत तर त्यांनी पुढच्या महासभेमध्ये वैद्यकीय अहवाल सादर करण्याची मागणी केली.
नगरसेवक दत्ता साने म्हणाले, शिक्षण विभागातील प्रशासन अधिकाऱ्यांना कशाचेही गांभीर्य नाही. महापालिकेच्या वतीने रेनकोट, बूट, गणवेश, स्वेटर वाटप करण्यात येते. त्यावर नियंत्रण नाही. पावसाळ्यामध्ये स्वेटर आणि हिवाळ्यात रेनकोट वाटप असा उलट पुरवठा केला जातो. सहा महिने उशिरा वह्या दिल्या जातात. शाळांमध्ये साहित्य देण्यात खूप मोठे गौडबंगाल आहे. त्यामुळे शिंदे यांची बदली करणे संयुक्तिक राहील.
सीमा सावळे म्हणाल्या, शिक्षण विभागामध्ये कधीही पुरवणीची खरेदी केली गेली नाही. मात्र या प्रशासन अधिकारी काहीतरी नवा पायंडा पाडत आहे. त्या नगरसेवकांना कधीच गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना कधीही फोन केला तरी त्याला त्या उत्तर देत नाहीत. त्यानंतर त्यांना समोरासमोर विचाराल्यानंतर त्यांची कारणे तयार असतात. त्यामुळे त्यांची बदली करा.
फळे वाटण्यापेक्षा मुलींना सॅनिटरी नॅपकीन द्या
शिक्षण विभागाच्या कारभारावर बोलताना नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, शिक्षण विभागामध्ये अनेक खरेदींचा धूमधडाका सुरू आहे. विद्यार्थ्यांना फळे, अंडी देण्याची मागणी करण्यात येत आहे. टॅब, वह्या यांचीही खरेदी करण्यात येणार आहे. मात्र विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे याचाही विचार करा. आज मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकीन महत्त्वाचे आहेत. त्यांना फळे देण्यापेक्षा त्याचे वाटप करा.
शिक्षण मंडळात धुमाकूळ सुरू
भाऊसाहेब भोईर म्हणाले, शिक्षण मंडळाला 25 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर वाईट सवयी लागल्या आहेत. आज शिक्षण मंडळामध्ये धुमाकूळ सुरू आहे. शिक्षकांच्या बदल्यांवरून रोज नवीन राजकारण सुरू आहे. कोण कोणत्या नगरसेवकाच्या जवळचा आहे त्यावरून त्याच्या बदलीची शिफारस केली जात आहे. खर तर शिक्षकांची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे. यापुढे शिक्षकांनी फक्त सुट्टीच्या दिवशीच महापालिकेत आयुक्त किंवा सभापतींची भेट घेण्यासाठी यावे, असा ठराव करा. प्रत्येक नगरसेवकांनी एक शाळा दत्तक घ्यावी. आज शहरामध्ये देवाची मंदिरे चांगली आहेत मात्र ज्ञानमंदिरे नाही. त्यामुळे आपली शिक्षण व्यवस्था खालावत आहे. त्याचा विचार करावा.
शासनाने बदली केली तर मी जायला तयार आहे. कामाच्या बाबतीत मी कुठलाही हलगर्जीपणा करत नाही. बूट, रेनकोट वाटप याबाबत ठेकेदार न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर वाटप करण्यात आले त्यामुळे उशीर झाला. बाकी सर्व साहित्य विद्यार्थ्यांना वेळेत दिले आहे. खरेदीचे सर्व विषय भांडार विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामध्ये शिक्षण विभाग हस्तक्षेप करत नाही.
– ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग.