पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यातल्या त्यात भाजपकडून यासाठी विविध रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची आतापर्यंत भाषा वापरणा-या भाजपने अचानक आपल्या भूमिकेत बदल केला आहे. महापालिकेच्या पोटनिवडणुकांतील पराभवाने भाजपला वास्तव उमगले असावे म्हणून स्वबळाऐवजी युती करणे शहाणपणाचे ठरेल, अशी भूमिका स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने घेतली असावी, असे दिसते. राष्ट्रवादीचा पराभव करणे एकट्या भाजपला शक्य नसल्याचेही या पोटनिवडणुकांतून दिसून आले. त्यामुळे युती करण्याचा प्रस्ताव भाजपकडून शिवसेनेपुढे ठेवण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि खासदार अमर साबळे या दोघांनी हा प्रस्ताव शिवसेनेकडे मांडला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय चर्चांना जोर आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय, असा प्रश्न सर्वांकडून उपस्थित करण्यात येत होता. मात्र उध्दव ठाकरे यांनी शिवसेना केवळ जिवंतच ठेवली नाही, तर स्वबळावर लढत 63 आमदार निवडून आणले. याउलट महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. भाजपची सत्ता आली; मात्र त्यासाठी त्यांना शिवसेनेला सोबत घ्यावे लागले. शिवसेनेने सत्तेसाठी भाजपला साथ दिली असली, तरी त्यांची भूमिका सत्ताधा-यांची नव्हे तर, विरोधकांचीच असल्याचे दिसून येते. 2017 मध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकसह राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीतही स्वबळावर लढण्याची दोन्ही पक्षांनी भूमिका घेतली आहे. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपकडून युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी कॅम्प, रामनगर-विद्यानगर आणि मोहननगर अशा तीन प्रभागांत पोटनिवडणुका झाल्या. यात पिंपरी कॅम्पातून राष्ट्रवादीचे अरुण टाक, मोहननगरमधून राष्ट्रवादीच्या सुजाता टेकावडे आणि रामनगर-विद्यानगर प्रभागातून शिवसेनेचे राम पात्रे विजयी झाले. या तीनही निवडणुकांपैकी पिंपरी कॅम्पातील निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार न देता आरपीआयच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. उर्वरीत दोन निवडणुकांमध्ये भाजप स्वबळावर लढले. शिवसेनाही या तीन पोटनिवडणुकांमध्ये स्वबळावर लढली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश आले नाही. पोटनिवडणुकीतही युती करणे रास्त राहिले असते; मात्र स्वबळावर लढण्याची काही पदाधिका-यांना हौस होती. त्या हौसेपोटी भाजपने या पोटनिवडणुका स्वबळावर लढविल्या आणि भाजपची स्वबळाची हौस पूर्ण झाली. या हौसेचे मोल भाजपला चुकवावे लागले. यातून धडा घेत भाजपने सावरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करायची अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे. तसा प्रस्ताव शिवसेनेकडे ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पिंपरीतील आमदार ऍ़ड. गौतम चाबूकस्वार, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांच्याकडे हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
शिवसेनेच्या वतीनेही या प्रस्तावाचे स्वागत करण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचे सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून होत असतात. त्यामुळे युतीबाबतचा हा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे शिर्षस्थ नेतृत्व याबाबत काय निर्णय घेईल हा वेगळा भाग आहे. मात्र या प्रस्तावामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करणे सहज शक्य नाही, ही बाब भाजपच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या लक्षात आली असावी. तसेच चार सदस्यीय प्रभागपध्दतीने निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागासाठी निवडून येतील असे उमेदवार भाजपकडे नाहीत, तसे ते शिवसेनेकडेही नाहीत. त्यामुळे युतीचा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. युती झाल्यास भाजप-शिवसेना महापालिकेत सत्तेत येईल की नाही, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल; मात्र राष्ट्रवादीला मात देणे हे एकट्या भाजप किंवा एकट्या शिवसेनेला शक्य नाही, हे सध्याचे वास्तव आहे.