पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील बेघर नागरिकांसाठी महापालिकेने 10 शाळा आणि रात्र निवारा केंद्र असे एकूण 11 ठिकाणी निवार्यांची व्यवस्था केली आहे. त्या ठिकाणी त्यांना जेवण दिले जात आहे. या ठिकाणी सुमारे 300 नागरिक वास्तव्यास आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेले स्थलांतरीत कामगार व बेघरांची मोठी गैरसोय झाली आहे. त्या लोकांसाठी पालिकेने आकुर्डी, खंडोळामाळ चौकातील उर्दू विद्यालय, केशवनगर, चिंचवड येथील शाळा, नेहरूनगर शाळा, पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालय, भोसरीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, निगडी सेक्टर क्रमांक 22 येथील मधुकर पवळे विद्यालय, थेरगाव येथील शाळा, कासारवाडीतील माध्यमिक विद्यालय, दापोडीतील शहीद भगत सिंग शाळा, पिंपरीतील कमला नेहरू शाळा आणि पिंपरी भाजी मंडई येथील रात्र निवारा केंद्र येथे निवार्याची सोय केली आहे.
या ठिकाणी एकूण 300 नागरिक राहत आहेत. त्यांना जेवन दिले जात आहे. गादी व संतरजीची सोय केली आहे. तसेच, पिण्याची पाणी, स्वच्छतागृह, वैद्यकीय व सुरक्षा व्यवस्था केली आहे.
ही सुविधा शहरात घर नसलेल्या बेघरांसाठी आहे. मात्र, कोणाला इतर ठिकाणी जायचे असल्यास पालिकेचे पथक स्वत: त्यांना घरी सोडून येते. त्याबाबत संबंधित व्यक्तींची त्या परिसरात चौकशी केली जात आहे. आजारी व्यकींची पालिकेच्या वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. ज्या भागांत असे बेघर आढळून येतील, त्यांना वरील निवारा केंद्रात आणून सोडावे किंवा पालिकेच्या सारथी हेल्पलाईनच्या 8888006666 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन ढाके यांनी केले आहे.