निर्भीडसत्ता न्यूज –
राज्यातील बांधकाम कामगारांची परिस्थिती बिकट असून त्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावे. तसेच कोरोना कालावधीमधील दोन व तीन हजार रुपयांचे अनुदान अजूनही अनेक लाभार्थ्यांना मिळालेले नाही. नूतनीकरण, शिष्यवृत्ती, प्रलंबित लाभ, नोंदणीसह विविध प्रश्न आपण मार्गी लावावेत या मागणीसाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, प्रसिद्धी प्रमुख उमेश डोर्ले, विजय तापकीर,शिवाजी लांडगे, भास्कर राठोड, सुखदेव कांबळे आदी उपस्थित होते.
राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोना टाळेबंदीतील लाभ म्हणून बारा लाख कामगारांना लाभ दिला असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेकांना लाभ दिला नाही. आकडेवारी लपवण्यात येत असून नोंदणीचे काम प्रलंबित आहे. नोंदणी होत नाही. त्याचबरोबर नूतनीकरण ऑनलाइन पद्धतीने करायचे की ऑफलाइन पद्धतीने करायचे यावरच प्रशासनाचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यामध्ये अनेक बांधकाम कामगारांची विविध कामे रखडली आहेत. त्यांना मिळणारे पाच हजारांचे लाभसुद्धा रद्द करण्यात आलेला आहे. तो नव्याने पुन्हा सुरू करून त्याची रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत करावे. त्याचबरोबर सुरक्षा साधनांच्या वाटपाची प्रक्रिया पुन्हा जलदगतीने सुरू करावी. नूतनीकरण न झाल्यामुळे अनेक कामगारांना विविध लाभ मिळत नाहीत. ते लाभ मिळण्यासाठी नूतनीकरण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नूतनीकरणासाठी जाचक अटी रद्द करून कागदपत्रांमध्ये नूतनीकरण करण्यात यावे. तसेच सध्या कोरोनाचा कालावधी असल्यामूळे ज्यांचे पाच वर्षांचे शुल्क स्वीकारले आहे त्यांना विनानुतनीकरण लाभ देण्याबाबत विचार करण्यात यावा, आदी मागण्यांचे निवेदन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांना देण्यात आले.