मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारा सिंह यांचे निधन झाले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते.
‘माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारा सिंह यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,’ असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
सरदार तारा सिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. सरदार तारा सिंह यांनी मुंबई महापालिकेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं आहे.
2018 मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सरदार तारा सिंह ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले होते. मात्र ही भेट होऊ शकली नव्हती.
‘उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मी आलो होतो, पण भेट झाली नाही. PNB बँकेबाबत भेट घेण्यासाठी नाही तर शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल. कोण म्हणतो सरकार चालणार नाही?’ असा सवालच सरदार तारा सिंह यांनी विचारला होता.