स्त्री ही सर्वप्रथम कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा कणा आहे. आहार ठरवण्यापासून ते खाऊ घालण्यापर्यंतचे सर्व काम स्त्रीच करते. मात्र, दुर्दैवाने स्त्रीच्या आरोग्याचे महत्त्व तिला स्वतःलाच बऱ्याचदा वाटत नाही. आपल्या आहारातील सर्व घटक आणि त्यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण यावर शरीर मन आणि बुद्धी यांचा समतोल अवलंबून असतो. यापैकी एखादा जरी घटक नसला किंवा कमी पडला किंवा सतत कमी पडत गेला तर शरीरात बिघाड होण्याची सुरुवात होत असते. स्त्रीच्या बाबतीत या मुद्द्याकडे लक्ष देणे विशेष गरजेचे आहे. कामाच्या रहाट गाडग्यात ती स्वतःच्या आहाराबाबत कायमच निष्काळजी असते. विशेषतः नोकरी करणाऱ्या स्त्रीया स्वतःच्या आरोग्याची ससेहोळपट करून घेतात. अशा महिलांनी आपल्या आहाराचे नियोजन कसे ठेवावे, याचा जागतिक महिला दिनानिमित्त घेतलेला हा आढावा.
स्त्री हाच आरोग्याचा केंद्रबिंदू मानून तिची लहानपणापासून जोपासना केली तर समाजाचीच नाही तर देशाची आरोग्याची पातळी निश्चितच उंचावेल. स्त्रीच कुटुंबाचा आहार ठरवते, तयार करते, सर्वांना देते, अन्नाची विवंचना करते व अख्ख्या संसाराचा गाडा ओढते. या सर्वांकरता आहारशास्त्राच्या दृष्टीकोनातून तिला पोषकतत्त्वांची अधिक गरज असते. तिला आहाराच्या मूलतत्त्वांचा आरोग्याशी असणारा संबंधच माहित नाही. बऱ्याचदा स्त्रीच्या आरोग्याचे महत्त्वही तिला वाटत नाही. कारण, खाणे म्हणजे केवळ पोट भरणे अशीच समजूत असल्यामुळे वेगवेगळ्या पाककृती करून अन्न शिजवणे ते आग्रह करून खाऊ घालणे व कुटुंबाला खुश करणे, यालाच ती प्राधान्य देत असते. स्त्री हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. आजमितीला नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा आकडा सातत्याने वाढत आहे. खरं म्हणजे स्त्रीला तिच्या जीवनाच्या प्रत्येकच महत्त्वाच्या पायरीवर सत्वयुक्त संतुलित आहाराची विशेष गरज असते.
जन्मानंतर पहिली काही वर्षे, नंतर वयाची 15 ते 25 वर्षे पौगंडावस्था, विवाहानंतर गर्भावस्था, त्यानंतर प्रसूतीनंतरची अवस्था या सर्व अवस्थेतून जाताना स्त्रीला पोषकतत्वांची गरज असते. परंतु, सर्वात अधिक पोषकतत्त्वांची गरज असते ती नोकरी करणाऱ्या स्त्रीला. तिला दिवसाच्या चोवीस तासात अठ्ठावीस तासांचे काम करण्याची क्षमता हवी असते. कारण ती तिहेरी भूमिका बजावत असते. मुलांना जन्म देऊन वाढवणे, त्यांच्यावर संस्कार घडवणे, त्यांचा अभ्यास घेणे, कलागुणांची वाढ करणे याबरोबरच घर सांभाळणे, स्वयंपाक, नोकर चाकर, भाजीपाला किराणा बाजारहाट करणे, अपत्यांचे लग्न कार्य, लेकी सुनांची बाळंतपणे, नातवंडाची देखभाल आणि जोडीला नोकरीचा ताण व जबाबदारी, या बहुविध कामाकरता तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आईचा आहार आधीच अपुरा असेल आणि त्यात औषध योजनेची वेळ आली तर अन्नघटकांची कमतरता अधिकच वाढते.
नोकरी करणाऱ्या स्त्रीयांची तर फार आबाळ होत असते. स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला स्त्रीला वेळच मिळत नाही. कामांच्या रगाड्यात होणाऱ्या आहारघटकांच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. या अभावापायी लवकरच तिचे शरीर थकते. योग्य ते घटक न मिळाल्यामुळे नवीन जोमदार पेशींची निर्मिती करण्यास ते शरीर असमर्थ होते.
रक्तक्षय, डोकेदुखी, पाठदुखी, अपचन, जीव घाबरा होणे, पाळीच्या तक्रारी, थकवा, भूक न लागणे, सांधेदुखी यांसारख्या कुरबुरी सुरू होतात. त्याचेच पुढे एखाद्या रोगात रूपांतरण होऊ शकते. या स्त्रियांच्या आहारात मुख्यत्वे प्रोटीन्स, लोह, कॅल्शियमचा खूप अभाव आढळतो. याच पोषकतत्त्वांची तिला अत्यंत आवश्यकता असते.
आपल्याकडील मुंबई, पुण्यासारख्या इतरही मोठ्या शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा आकडा खूप मोठा आहे. कितीतरी स्त्रिया न खातापिताच सकाळी लवकर घर सोडतात. लोकलने, बसने दूर दूर कामावर जातात. दुपारच्या जेवणात कोणी भाजीपोळीचा डबा नेतात तर काही जणी जंक फूडवर राहतात. आयटी सारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रीयांना रात्री घरी पोहोचायला उशीर होतो. मग शॉर्टकट किंवा एकांगी अन्नप्रकारावर निभावणे असे प्रकार होतात. अशा तऱ्हेने मग पोषकतत्वांची गरज भागत नाही आणि लवकरच प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात. या स्त्रिया अकालीच वार्धक्याकडे झुकतात. शिफ्टमध्ये नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आढळते. ते कमी खाण्यामुळे नसून अयोग्य खाण्यामुळे असते.
दिवस उजाडल्यापासून झोपेपर्यंत स्त्रीयांची दिनचर्या सतत धावपळीची असते. सकाळी चहा आणि जोडीला बिस्किटे नंतर घरातली कामे, स्वयंपाक व काहीच न खाता अगदी घाईघाईने कामावर जाणे. दुपारी भाजीपोळीचा डबा आणि वेळेस चहा, कधी समोसे, वडा पाव यांसारखे जंकफूड आणि रात्री थोडसं जेवण. अशा दिनचर्येतूनही हवे ते, हवे तितके आहारघटक मिळत नाहीत. यामधूनही प्रोटीन्स, कॅल्शियम, लोह, जीवनसत्व अ, ई, क, ब चा अभाव आढळतो. तसेच व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डी 3 कमतरता खुप जास्त आढळते. यातून केवळ किमान पातळीपर्यंत कॅलरीज मिळतात. प्रौढ स्त्रीला दररोजच्या धावपळीत योग्य प्रमाणात कॅलरीजची आवश्यकता असते. मात्र, नोकरी करणाऱ्याला स्त्रीला तेवढी स्वत:ची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. त्यातून तिला रोज योग्य प्रमाणात प्रोटीन्स, कॅल्शियम आणि लोह मिळायला हवे. उदा. एक वाटी वरणातून सात-आठ ग्रॅम प्रोटीन्स, तसेच दुधातून कॅल्शियम मिळते.
स्त्रीची ही गरज पौष्टिक अन्नातून भागू शकते ज्यामध्ये धान्य, डाळी, भाज्या, फळे, दूध, तेल, तूप असेल, ज्यातून पोटघटकांचा समावेश होईल. सर्व घटक आणि त्यांचे एकमेकांशी असणारे प्रमाण यावर शरीर मन आणि बुद्धी यांचा समतोल अवलंबून असतो. यापैकी एखादा जरी घटक नसला किंवा कमी पडला किंवा सतत कमी पडत गेला तर शरीरात बिघाड होण्याची सुरुवात होत असते.
पौष्टिक अन्नाने शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढीस लागते. म्हणूनच अन्न ही व्याख्या सर्वच खाद्य पदार्थांना लागू होत नाही. ज्या अन्नात प्राण देण्याची शक्ती आहे तेच अन्न, अन्न या व्याख्येस पात्र आहे. बाजारचे पॅकबंद डबाबंद, प्रक्रिया केलेले अशी प्राणशक्ती द्यायला असमर्थ असतात. नोकरी करणारीने आपल्या दिनचर्येत सुधारणा ही करायलाच हवी. रोजच्या दिनचर्येत थोडेफार बदल केल्यास आणि संतुलित आहाराचे नियम पुष्कळ अंशी पाळल्यास बऱ्याचश्या तक्रारी आपसूकच कमी होतील. अशा प्रकारे आपल्या व कुटुंबाच्याही खाण्यापिण्याकडे विचारपूर्वक लक्ष दिल्यास नोकरी सुखकर होईल. आणि सर्वांचेच आरोग्य टिकवायला मदत होईल.नोकरी करणाऱ्या स्त्रिायांचा आहारात काय असावे आणि काय नसावे याबाबत –
1. सकाळी उठल्यावर लिंबू मध पाणी घ्यावे
2. थोडा व्यायाम-सूर्यनमस्कार त्यानंतर पारंपारिक नाश्ता
3. सकाळचा नाश्त्यात अंकुरित कडधान्य, उसळी, अंडे, सोजी, थालीपीठ, दशम्या, इडली, दोसे, अप्पे पोहे, उपमा, थालीपीठ सारखे
पारंपारिक पदार्थच घ्यावेत.4. जोडीला दूध किंवा ताक किंवा नाचणी खीर असावी. त्याबरोबर फळ आणि भिजवलेल्या मनुका असल्यास उत्तम.
5. दुपारच्या भाजी पोळीच्या डब्यात भाजी शक्यतो बेसन लावून किंवा डाळी, शेंगदाणे, तीळ घालून करावी.
6. डब्यातच मुळा टमाटर, काकडी गाजर घ्यावे. जमल्यास एक फळ असावे. (अगदी चिंच, बोर, आवळे सुद्धा)
7. सायंकाळी- मुरमुरे, फुटाणे, लाह्या, शेंगदाणे, गूळ, चिवडा (कच्चा साधा) गोपालकाला, पॉपकॉर्न, सातुचे पीठ, भेळ असे पदार्थ घ्यावे.
8. घरी यायला वेळ होत असेल तर चिवडा मुरमुरे, फुटाणे, पॉपकॉर्न ऑफिसमधेच कपाटात ठेवावे आणि खावे.
9. रात्रीचे जेवण – रात्रीच्या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर, रोज एक तरी लिंबू घ्यावे.
10. झोपताना – दूध घेतल्यास उत्तम. तळलेले व गोडाचे पदार्थ टाळावेत.
नोकरी करणाऱ्या स्त्रीयांमध्ये आणखी एका गोष्टीबद्दल जागरुकता असायला हवी ती म्हणजे काम ऑफिसमध्ये काम करत असताना काम करण्याची, बसण्याची तसेच वावरण्याची पद्धत. याचाही आरोग्यावर परिणाम होताना आढळतो. काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या ढबीत बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही. यासाठी खालील काही गोष्टी पडताळून पाहाव्यात –
1. पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे, खूप पूढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे, जर कॉंप्युटरवर काम असेल तर ते करताना ऍडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा.
2. आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी.
3. आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
4. जर लघवीस लागली, तर शक्यतो ती दाबून ठेवू नये, कारण यामुळे देखील काही अपाय होऊ शकतो.
5. जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा.
6. सारखा चहा, कॉफीवर जोर देवू नये. तसेच चहाबरोबर खाण्यास मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग,मटकी, सोयाबीन्स्) न्यावीत.
7. कॉंप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणाऱ्या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
8. जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटऱ्या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.
9. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्य व सौंदर्य यावर घाला घालणाऱ्या मायग्रेन, कंबर, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर यासारख्या अनेक विकरांची कारणे यात असतात आणि यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच वरील बऱ्याच सूचना विचारात घ्याव्यात.
डॉ. सुप्रिया पुराणिक