मुंबईतील कमला मीलमधील अग्नीतांडवानंतर लागलेली आग राजकारणात आणखी धुमसत आहे. त्याच्या निखारामुळे राज्यातील सगळ्या शहरांना जाग आली असून बेकायदा हॉटेल्स, पब आणि हुक्का पार्लरकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. मुंबई, पुणे महापालिकांना या अग्नीतांडवामुळे जाग आली असून त्यांनी कारवाई देखील केली. दुसरीकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेला काही जाग आलेली दिसत नाही. महापालिका प्रशासनाने बेकायदा हॉटेलबाबत कान-डोळे बंद करून घेतले आहेत. बेकायदा हॉ़टेलमुळे आग लागली, तर लागू द्या आणि दोन-चारण जण होरपळू द्या, अशा भूमिकेत प्रशासन असल्याचे दिसते आहे.
मुंबईतील कमला मील इमारतीतील अग्नितांडवात १५ जणांना जीव गेला. या आगीचे कारण बेकायदा हॉटेल व हुक्का पार्लर असल्याचे समोर येत आहे. या आगीनंतर मुंबईतील राजकारण तापले असून अजूनही नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे बेकायदा, अतिक्रमण करून थाटलेल्या हॉटेल्स, पब आणि हुक्का पार्लर चर्चेत आले आहेत. या आगीच्या घटनेतून जाग आलेल्या मुंबई महापालिकेने जबाबदार अधिका-यांवर कारवाईचा बडगा उगारला. सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक हॉटेल्सची पाडापाडी सुरू केली. पुणे महापालिकेनेही तातडीने बेकायदा हॉटेलवर कारवाई सुरू केली असून अधिका-यांच्य जबाबदा-या निश्चित केल्या.
या आगीच्या बाबतीत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोणतेही गांभीर्य नाही. शहरात फुटपाथवर चायनीज सेंटरसह अनेक हॉटेल्स, खानावळी थाटात सुरू आहेत. अनेक मोठ मोठे डायनिंग हॉल पार्कींगमध्ये आहेत. शहरातील तारांकीत हॉटेल्सने परवानगीविना बेकायदा बांधकामे व बदल केले आहेत. आयटी सिटी होत असलेल्या पिंपरी-चिंचमध्ये कित्येत पब, हुक्का पार्लर बेकायदापणे सुरू आहेत. ते देखील मोठ्या अग्नीतांडवाचे कारण ठरू शकतात. पण, सत्ताधारी, विरोधकांना त्याचे गांभीर्य नाही. तर, महापालिका प्रशासनाला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. निव्वळ चालढकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रमुख जबाबदारी असलेला बांधकाम परवाना व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग हातावर हात ठेवून आहे.
अतिक्रमण विभागा असला, तरी कारवाई प्रभाग अधिकारी करतात. त्यामुळे कोणती माहिती नसल्याचे अतिक्रमण अधिकारी सांगतात. तर, अग्निशमन विभागाला केवळ शहरातील अशा बेकायदा व आगीसाठी कारण ठरणा-या हॉटेल्सचे सर्वेक्षण व तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, बेकायदा हॉटेलबाबत सर्वेक्षणाचे खूळ काढून केवळ कारवाईसाठी चालढकल करण्याचा प्रयत्न आहे. तर, शहरात आगीची मोठी घटना घडल्यानंततर नागरिकांचा बळी गेल्यानंतर पालिकेचे डोळे उघडणार का, असा सवाल उपस्थित होतो आहे. पालिकेला याचे भान असणे गरजेचे असून शहराच्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे असून त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.