निर्भीडसत्ता न्यूज –
पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, श्रीरंग बारणे, शिवसेना शहरप्रमुख व गटनेते राहुल कलाटे, महिला शहर संघटक सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, अॅड. सचिन भोसले, मीनल यादव, रेखा दर्शिले, माजी नगरसेवक मारुती भापकर, धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते. रस्त्यांच्या कामांमध्ये रिंग करुन हा भ्रष्टाचार झाला असून तब्बल ८० ते ९० कोटी रुपयांची लूट झाली आहे. हे कागदोपत्री स्पष्ट झाले असून ‘ना भय, ना भ्रष्टाचार’ असा नारा देणा-यांनी वर्षभरात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.
यापूर्वी त्याच ठेकेदारांनी याच प्रकारची रस्त्यांची कामे २५ ते ३० टक्के कमी दराने केली होती. या वर्षी त्याच ठेकेदारांनी संगनमताने ही कामे ४ ते १० टक्के ज्यादा दराने भरली. त्या रस्त्यांच्या कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली असून सर्व कामांमध्ये रिंग करून तेच तेच ठेकदार बसविल्याचे दिसते. या ४२५ कोटी रुपयांच्या कामांच्या फायलींवर महापालिका आयुक्तांनी ७ डिसेंबर २०१७ या एका दिवशी सह्या केल्याचे उघड झाले आहे. भ्रष्ट्राचाराच्या या प्रकरणी मुख्यमंत्री, लाचलुचपत प्रतिबंध विभाग आणि अमंलबजावणी संचानलय आणि पंतप्रधान यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. शिवसेना या प्रकरणी मागे हटणार नसून चौकशी करण्यास भाग पाडणार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. महापालिका आयुक्तांच्या सहमतीने हा कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकण्याचे धाडस पदाधिका-यांनी केले असल्याचा आरोपही शिवसेनेने केला.