नागरिकांना मुबलक पाणी देण्यासाठी भाजप प्रयत्नशील; पक्षनेते एकनाथ पवार यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
निर्भीडसत्ता न्यूज –
भाजप शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाणी मिळावे. यासाठी प्रयत्न करीत आहे. निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची आम्ही निश्चितपणे पूर्तता करणार आहोत. वीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका सत्तेत असताना पाण्यासारखी गंभीर समस्या ते सोडवू शकले नाहीत. सत्ता गेल्यानं हेच राष्ट्रवादीचे नेते काहीही बरळू लागले असून एका वर्षात प्रश्न मार्गी लावा, असा कांगावा करत आहे. त्यामुळे सत्ता नसल्याने जळफळाट झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःला आवरावे, असा सल्ला महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून केला आहे.
महापालिकेत मंगळवारी (दि. २०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, पाणीपुरवठा लाभकरात दुप्पट वाढ करण्याच्या मुद्द्यावर शहरातील नागरिकांना भडकविण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे. गेली वीस वर्षे राष्ट्रवादी महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारत होती. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा भाजपने पराभव केला, या पराभवाच्या गर्तेतुन बाहेर न आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे पदाधिकारी भाजपावर सातत्त्याने बिनबुडाचे आरोप करीत आहे. राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
पाणीपट्टीवाढी संदर्भात स्थायी समितीने प्रस्तावास मंजुरी दिली आहे. परंतु, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर केलेला नाही. पिंपरी चिंचवड शहरात पाण्याची समस्या बिकट आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना माहित आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते याचे भांडवल करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहेत. सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करून महानगरपालिकेत याच लोकांनी भ्रष्टाचार व चुकीचा कारभार केला आहे. राष्ट्रवादीने घरकुल मध्ये भ्रष्टाचार केला. बीआरटीएस रस्त्याच्या कामामध्ये १ कि.मी.ला वीस कोटी रुपये ठेकेदारांना दिले. पवना बंद पाईप लाईन योजनेत जागा ताब्यात नसताना कोट्यावधी रुपये ठेकेदारांच्या घश्यात घातले. सांगवीतील गॅस शवदाहिनी बसविणेच्या कामात राष्ट्रवादीने भ्रष्टाचार करुन मृतांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचा देखील प्रकार केलेला आहे आहे. येथील जनतेच्या टाळू वरचे लोणी खाल्लेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतःची पात्रता तपासावी, असे आव्हान पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिले आहे.