महावीर जिनका नाम है! कुण्डलपुर जिनका धाम है! अहिंसा जिनका नारा है! ऐसे त्रिशला नंदन को लाख प्रणाम…
रिता शेटिया
धर्म हा शब्द दृ या धातूपासून बनलेला आहे, त्याचा अर्थ “धारण करणे” तसेच “धरती लोकान ध्रियते पुण्यात्माभी इति वा” म्हणजेच लोकांना जो धारण करतो, जो पुण्यात्मा पुरुषांकडून धारण केला जातो, तो म्हणजे धर्म होय. पण या व्याखेमधून धर्माचा पूर्ण अर्थ स्पष्ट होत नाही. तर खरा धर्म हा “मानवता धर्म” आहे, भगवत गीतेत धर्माचा अर्थ “स्वधर्मे निधनं श्रेय” या श्लोकात धर्म शब्दाचा अर्थ वर्ण श्रम विहित कर्तव्य असाच आहे. भगवान महावीरांनी धर्माची व्याख्या करताना सांगितले आहे कि, “वत्थु सहावो धम्मो” म्हणजेच वस्तू चा स्वभावाच धर्म आहे. ज्याप्रमाणे अग्नीचा स्वभाव जाळणे, पाण्याचा स्वभाव शीतलता प्रदान करणे आहे. त्याप्रमाणेच आत्म्याचा मुलभूत स्वभाव ज्ञान, दर्शन आणि चरित्र आहे आणि हाच खरा धर्म आहे.
प्रत्येक व्यक्ती कुठून आला आहे आणि कुठे जाणार आहे, हे कुणालाही सांगता येणार नाही. परंतु जो आला आहे त्याला जावे लागणार आहे हे शाश्वत सत्य आहे. जन्म आणि मरण यामधील जीवन जगणे हि एक कला आहे. जसे दिवस आणि रात्र हा क्रम निरंतर आहे. दिवस नंतर रात्र आणि रात्र नंतर दिवस हे ज्याने जाणले, तोच सहजपणे जीवन जगू शकतो . हेच महावीरांनी केले, ते स्वयं बुद्ध होते, विचारक होते, चिंतक होते, जीवनाच्या प्रत्येक बाबतीत ते चिंतन करत. जे झाले आहे, जे होणार आहे आणि जे होत आहे याच्या प्रती सहज भाव ठेवणे म्हणजे जीवन होय. युद्धा च्या अगोदर श्री कृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले होते कि, जीवन आणि मरण यामधील जे शाश्वत आत्मतत्त्व आहे, याचा विचार जो करतो, आणि कर्तव्य करत राहतो तोच मोक्ष प्राप्त करू शकतो तेव्हा जास्त विचार न करता धर्म आणि कर्तव्याचे पालन कर, हेच तुझ्यासाठी योग्य आहे.
जसे दोन डोळ्यांमध्ये अंतर आहे तसेच दृष्टी आणि दृष्टीकोण, समज आणि सामंजस्य यामध्ये आहे. आपली भावना जशी असेल तसा त्याचा परिणाम आपल्याला अनुभवायला मिळेल. बाहेरील कोणत्याही वस्तू मध्ये बंध नाही, कि मोक्ष नाही. बंधन आणि मुक्ती दोन्हीही मानवाच्या मना मध्ये असतात. “परिणामे बंधो, परिणामे मोक्खो” म्हणजे कुणासाठी जी वस्तू आनंद देणारी असते, तीच दुसर्यासाठी कष्ट देणारी असते. जसे तूप कुणासाठी अमृत तर कुणासाठी विष असते, सावली कुणासाठी चांगली तर कुणासाठी कष्ट देणारी असते. कुणाला राग रंग महफिल आवडते तर कुणाला पर्वतावर जाने पसंत असते. एकच स्थान पण प्रत्येकाचा दृशिकोन आणि दृष्टी वेगवेगळी असते. कुणी रावणाचे दहन करतात तर, कुणी पूजा करतात. म्हणजेच वस्तू हि वस्तू आहे, व्यक्ती हि व्यक्ती आहे फक्त त्याकडे पाहणार्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. महावीरांनी मोक्ष प्राप्ती साठी चातुर्सुत्री सांगितली आहे.
दान, शील, तप आणि भावना. अंतिम भावना महत्वपूर्ण आहे, कारण भावना हे असे सूत्र आहे कि ज्या साठी न तर धन खर्च करण्याची गरज आहे न तर जप करण्याची गरज आहे. न तर वेळ देण्याची गरज आहे, गरज आहे ती फक्त पवित्रता ठेवण्याची. “मन मै हि है नरक भयंकर मन मै स्वर्ग सुहाना” म्हणजेच मनाची पवित्र भावनाच स्वर्ग आहे, आणि कलुषित भावना नर्क आहे.
प्रत्येकालाच स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे, कुणीही कुणावर बंधन टाकू नये. हे सांगताना त्यांनी “अहिंसा” हे महान तत्व सांगितले. “सव्वे पाणा, सव्वे भूता, जीवा सव्वे सत्ता ण हन्तव्वा ण अज्झावेय्व्वा, णरीघेत्व्वा, णपरीतावेय्व्वा !” अहिसेची परिभाषा या एका सूत्रामध्ये अगदी उत्तम रित्या सांगितली आहे. अहिंसक जो आहे त्याने कोणत्याही जीवाला ईजा पोहचू नये, कुणावरही जोर जबरदस्ती करू नये, कुणालाही आपला गुलाम बनू नये, कुणालाही मानसिक संताप देऊ नये, प्राणी मात्रांचे हनन करू नये. महावीरांनी सांगितलेल्या सिद्धांत, तत्व आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्व पूर्ण आहे, गरज आहे ती प्रत्यक्षात जीवनात उतरवण्याची.