जलसंपदा खात्याकडे 267 एमएलडी पाण्याची मागणी
निर्भीडसत्ता – पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा आणि भामा आसखेड धरणात पाणी धरणात पुनःआरक्षित ठेवण्यात यावे, याकरिता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या सुचनेनूसार पिंपरी-चिंचवड महापालिकेनेे फेर प्रस्ताव दाखल केला आहे. प्रतिदिन भामा-आसखेड धरणातील 167 एमएलडी आणि आंध्रा धरणातील 100 एमएलडी असे एकूण 267 एमएलडी पाण्याची मागणी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. महापालिका दररोज 480 एमएलडी पाणी धरणातून घेते. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या आणि सद्यस्थितीत पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता, भविष्यात शहरातील नागरिकांच्या पाण्याची तहान भागविणे अशक्य आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्या विचारात घेवून प्रतिदिन भामा-आसखेड धरणातील 167 एमएलडी आणि आंध्रा धरणातील 100 एमएलडी असे एकूण 267 एमएलडी पाण्याची मागणी केलेली आहे.
मात्र, भामा-आसखेड व आंद्रा धरणातील पाण्याचे आरक्षण मंजूर झाल्यानंतरही महापालिकेने कुठलाही करारनामा जलसंपदा विभागाशी केला नाही. तसेच सन 2016-17 मधील भाववाढ निर्देशानुसार पाण्याच्या आरक्षित ठेवलेल्या सिंचन पुर्नस्थापन रक्कम 238.53 कोटी रुपये भरण्यात आलेली नाही. त्यामुळेच हे पाण्याचे आरक्षण रद्द केल्याचे पत्र पुणे पाटबंधारे मंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे 27 जुलै 2017 रोजी दिले होते. याबाबत पाटबंधारे विभागाने राज्याचे जलसंपदा सचिव, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे यांना पत्राद्वारे कळविले होते.