निर्भीडसत्ता न्यूज –
आपण उगीचच कशालाही घाबरत असतो. कशाचाही बाऊ करतो. प्रत्येकाने भीती बाळगली पाहिजे. मात्र ती सात्विक असावी. त्यासाठी संतांची, ग्रंथांची आणि देशाची सेवा करावी. सेवेमुळे माणूस निर्भय होतो, त्यामुळे प्रत्येकाने सेवाभाव जपला पाहिजे, असे मत कीर्तनकेसरी हभप चंद्रकांत महाराज वांजळे यांनी व्यक्त केले.
अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विष्णूराज मंगल कार्यालयाच्या विठ्ठलराज मंदिरात सप्ताहानिमित्त गुरुवार दि. 17 ते 24 मे दरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहेत. सप्ताहातील सहाव्या दिवसाचे कीर्तन हभप चंद्रकांतमहाराज वांजळे यांनी सादर केले. संत तुकाराम महाराज यांचा ‘ज्याची खरी सेवा, त्याच्या भय काय जीवा’ या अभंगाचे निरुपण त्यांनी या वेळी केले.
सप्ताहाचे मुख्य आयोजक महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे पाटील, नगरसेवक विनोद नढे, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, माजी नगरसेवक मनोहर पवार, ज्ञानेश्वर काळे, बजरंग नढे, शंकर नढे, बाळासाहेब वाल्हेकर, अंकुश राजवडे, इंगवले महाराज, मनोहर भोसले, सुदाम कापसे, सखाराम नखाते आदी या वेळी उपस्थित होते. रहाटणीतील रिच पार्क हाउसिंग सोसायटीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त नारायण नखाते यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
हभप चंद्रकांतमहाराज या वेळी म्हणाले की, आपण उगीचच घाबरून जातो. भीतीमुळे दु:ख येतात. त्यासाठी निर्भय होणे आवश्यक आहे. सेवेतून निर्भयता प्राप्त होते. त्यामुळे निष्काम सेवा केली पाहिजे. सेवा करताना कोणतीही अपेक्षा नसावी. संवादालाही आपल्या आयुष्यात महत्त्व आहे. त्यामुळे संवाद वाढला पाहिजे. मात्र असे करताना आपण बरळत तर नाही ना, याचा विचार केला पाहिजे. उगीचच बरळणे आपल्यासाठी घातकच आहे. त्यामुळे मोजक्या शब्दांमध्ये संवाद साधता आला पाहिजे.