निर्भीड न्यूज –
महावितरण कंपनीच्या चिंचवड उपविभाग शाखा – 3 कडून 2014 पासून मोन्टेल कंपनीचे वीजमीटर बसविण्यात आले आहेत. यातील बहुतांश मीटर नादुरुस्त असून, ग्राहकांना याचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे मीटर बदलून मिळावेत, अशी मागणी काळेवाडी येथील ओम साई ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांनी केली आहे.
महावितरण कंपनीच्या चिंचवड उपविभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तापकीर यांनी याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, चिंचवड उपविभागतर्फे 2014 पासून मोन्टेल कंपनीने मीटर बसवून देण्यात आले आहे. यातील बहुतांश मीटर नादुरुस्त आहेत. त्यामुळे वीज वापराचे रिडींग कमी-अधिक नोंद होते. परिणामी ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसतो. याबाबत काही ग्राहकांनी तक्रार केली. त्यानंतर आपल्या उपविभागातर्फे 85 ग्राहकांना मीटर बदलून देण्यात आले आहे. माहिती अधिकारांतर्गत याबाबत माहिती समोर आली आहे.
मोन्टेल कंपनीच्या मीटरमध्ये सातत्याने बिघाड होत आहे. याबाबत बहुतांश ग्राहक अनभिज्ञ असून, त्यांनी याबाबत तक्रार केलेली नाही. असे असले, तरी त्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोन्टेल कंपनीचे सर्व मीटर बदलून देण्यात यावेत, अशी मागणी तापकीर यांनी निवेदनाव्दारे केली आहे.