रिता मदनलाल शेटिया, पुणे.
जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. आणि प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. जगातील सर्वात कठीण कामे दोन असतात. एक म्हणजे आपल्या डोक्यातील दुसऱ्याच्या डोक्यात उतरवणे आणि दुसरे म्हणजे दुसऱ्याच्या खिशातील पैसा आपल्या खिशात आणणे. पहिले काम करता येणाऱ्याला गुरु म्हणतात तर दुसरे काम यशस्वीपणे करता येणारा व्यापारी असतो. गुरु चे हे काम त्यासाठी अधिक महत्वाचे आहे कि पैसा कसा मिळवायचा हे सांगत असताना, जगायचे कसे आणि कशासाठी ? हे हि ते सांगून जातात. जीवनाचा खरा अर्थ आणि लक्ष्य सांगणारे गुरु म्हणजे आपले मार्गदर्शक च असतात.
“गुरु बिन कोण बतावे बाट”। गुरु शिवाय जीवन म्हणजे पाण्याशिवाय जीवन होय. स्कंद पुराणात (गुरुगीता) मध्ये गुरूचा महिमा खूप सुंदर सांगितला आहे. ” गुकारस्त्व न्धकार: स्याद, रुकार स्तेज उच्च्ते !अज्ञान ग्रासक ब्रम्ह, गुरुदेव न संशय: !” गु शब्दाचा अर्थ अंधकार आहे, रु चा अर्थ तेज म्हणजेच अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा तेज स्वरूप ब्रम्ह “गुरु ” आहे . यात काहीही शंका नाही कि यापेक्षा सुंदर गुरूची व्याख्या होऊ शकते.
उत्तम गुरु कसे असतात याचे उत्तम उदाहरण द्यावेसे वाटते, ज्यातून गुरु चा महिमा लक्ष्यात येतो. एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जुडो (खेळ) शिकण्याची इच्छा असते, ती इच्छा तो त्याच्या गुरूंना सांगतो. ते हि त्याला उद्यापासून ये असे सांगतात, पण त्याच दिवशी त्याचा एका अपघातात डावा हात जातो, नि त्याचे जुडो शिकण्याचे स्वप्न स्वप्नच राहते. हि बातमी त्याच्या कोच (गुरु) ला कळते आणि ते त्याच्या पालकांबरोबर भेटून सांगतात कि याची जुडो शिकण्याची इच्छा मी पूर्ण करणार. सगळ्यांनाच हे एकूण धक्का बसतो कि हे गुरु असे काय म्हणतात. कारण जुडो साठी दोन्ही हात लागतात. शेवटी गुरुच ते पालकांची आणि त्या विद्यार्थ्याची परवानगी घेतात आणि मग त्याचे जुडो चे प्रशिक्षण चालू होते, कोच त्याला जुडो चा एकच डाव शिकवतात. तो विद्यार्थी त्यांना विचारतो कि, सर तुम्ही मला एकच डाव शिकवत आहात मी कसा जुडो शिकेल, कोच काहीही न बोलता त्याला तू फक्त मी सांगतो ते कर असे म्हणून वर्षभर त्याला एकच डाव शिकवतात, मी स्पर्धेत भाग कसा घेणार आणि कसा जिंकणार ? हा प्रश्न त्याला पडतो. एक दिवस आंतरराष्टीय स्पर्धेत ते त्याला घेऊन जातात, तिथे तो प्रत्येक फेरीमध्ये जिंकत जातो, हे त्यालाही कळत नाही कि कसे, शेवटी अंतिम फेरीमधेही त्याचा विजय होतो… सर्वांनाच आश्चर्य वाटते, तेव्हा एक पत्रकार त्याच्या कोच जवळ येतो आणि त्यांना विचारतो कि हे कसे शक्य झाले… तेव्हा सर सांगतात कि, जुडो मध्ये तो जो डाव खेळला आहे त्यामध्ये प्रती स्पर्ध्याला समोरच्या व्यक्तीच्या डाव्या खांद्यावर हात ठेवायचा असतो, आणि याचा डावा हात अपघातात गेला. त्याच्या कामजोरीलाच मी त्याचे हत्यार बनवले… यामुळे तो अजिंक्य (Invincible) आहे.
एकलव्याच्या काळातील गुरु असो कि आजच्या आधुनिकीकरणाच्या काळातील गुरु असो आजही गुरूंचे स्थान तितकेच मोलाचे आहे. गुरु पूर्णिमा आपण नेहमीच साजरी करत असतो, कधी गुरु ला गिफ्ट देऊन तर कधी गुरु वंदना करून. गुरुनी देलेली शिक्षा असो वा गुरूंचे केवळ शब्दही काही वेळेस मोठी हिमत देऊन जातात, म्हणून जीवनात योग्य गुरू आपणास लाभले तर योग्य संस्कार होऊन आपण आदर्श जीवन जगू शकतो. कुसुमाग्रजांनी त्यांच्या कणा कवितेत खूप सुंदर सांगितले आहे,
“पाठीवरती हात ठेऊन नुसते लढा म्हणा ”
गुरु पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !