निर्भीडसत्ता न्यूज –
राठी चित्रपट सृष्टीचे नटसम्राट म्हणून ओळखले जाणारे श्रीराम लागू यांचे दुखद निधन झाले आहे. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीराम लागू यांच्या दीनानाथ रूग्णालयात उपचार सुरू होते. याच रूग्णालयात त्य़ांनी अखेरचा श्वास घेतला. गुरूवारी लागू यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती फारशी चांगली नव्हती. ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘पिंजरा’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘नटसम्राट’ या नाटकातली त्यांची अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका विशेष गाजली.
16 नोव्हेंबर 1927 रोजी सातारा येथे डॉ बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा लागू यांच्या पोटी डॉ श्रीराम लागू यांनी जन्म घेतला. बी जे पिंजरा वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी डॉक्टरची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी नाटकांत काम केले. डॉ श्रीराम लागू हे मूळचे कान, नाक, घसा शल्यविशारद परंतु आपला व्यवसाय सोडून ते अभिनयाकडे वळले इथे चित्रपटांपेक्षाही ते नाटकांत जास्त रमलेले पाहायला मिळाले. 100 हुन अधिक हिंदी मराठी चित्रपट, 40 हून अधिक हिंदी, मराठी, गुजराथी नाटके त्यांनी साकारली. सिंहासन, पिंजरा, झाकोळ या चित्रपटांसोबत हिमालयाची सावली, नटसम्राट, वेड्याचे घर उन्हात, सूर्य पाहिलेला माणूस, गिधाडे ही त्यांची गाजलेली नाटके आपल्या अभिनयाने चांगलीच रंगवली.
डॉ श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू यादेखील रंगभूमीवरील जाणत्या कलाकार. त्यांना “तन्वीर” नावाचा मुलगा देखील होता. 9 डिसेंबर 1971 साली तन्वीरचा जन्म झाला. परंतु वयाच्या 23 व्या वर्षीच त्याचे एका अपघातात निधन झाले. 1994 साली तन्वीर पुणे मुंबई मार्गे ट्रेनने प्रवास करत होता. खिडकी शेजारील सीटवर बसून तो पुस्तक वाचत असताना खिडकीबाहेरून कोणीतरी फेकलेला दगड थेट त्याच्या डोक्याला लागला. त्यामुळे जोरदार आघात होऊन तन्वीर कोमामध्ये गेला आणि एका आठवड्यातच त्याचा मृत्यू झाला. ह्या धक्क्यातून डॉ श्रीराम लागू आणि दीपा लागू स्वतःला सावरू शकले नव्हते. त्याच्या जन्मदिनी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी “तन्वीर सन्मान” नावाने नाट्यकर्मी पुरस्कार आयोजित केले जातात. यातून भारतभरातील रंगभूमीवरील कलाकारांना त्यांच्या प्रतिष्ठानतर्फे पुरस्कृत केले जाते.