पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोना महामारीच्या संकटात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शेकडो अधिकारी व कर्मचारी तसेच, कंत्राटी, हंगामी, रोजदारी, मानधनावरील तसेच, आऊटसोसमधील कामगारांचे कोरोनासंदर्भात काम करताना दुर्देवी मृत्यू झाल्यास 75 लाख अर्थसहायाचे सुरक्षा कवच त्यांच्या वारसाला दिले जाणार आहे. तसेच, एका वारसाला पालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाणार आहे.
शहरात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार व उपाययोजनेवर पालिकेतर्फे युद्धपातळीवर काम केले जात आहे. पालिकेचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. अनेकदा कोरोनाबाधित रूग्णांशी त्यांचा संपर्क येत आहे. आतापर्यंत 45 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे.
कोरोनासंदर्भातील काम करताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला अर्थसहाय देण्याचा व पालिका सेवेत सामावून घेण्याचा शासनाचा आदेश 9 एप्रिल 2020 ला लागू झाला आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वास्थ मिशनअंतर्गत ‘पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज इन्सुरन्स स्किम फॉर हेल्थ वर्कर्स फायटींग कोविड-19’ या योजनेअंतर्गत 50 लाखांचे अर्थसहाय दिले जाणार आहे. पालिकेकडून 25 लाखांचे अर्थसहाय दिले जाणार आहे. विशेष बाब म्हणून अनुकंपा तत्वावर नोकरीचा लाभ दिला जाणार आहे.
नोकरीचा लाभ न घेतल्यास पालिकेकडून अतिरिक्त 25 लाख रूपयांचे सहाय दिले जाणार आहे. कायदेशीर पात्र वारस तसेच, अविवाहित कामगारांसाठी त्यांच्यावर अंवलबून असणारे आई किंवा वडील, अविवाहित भाऊ किंवा बहिण यांना लाभ दिला जाईल. केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या मुदतीपर्यंत ही योजना लागू राहणार आहे. मृत्यू झालेले अधिकारी किंवा कर्मचारी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेचे काम करताना कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. सोमवारी (दि.20) होणार्या पालिक सर्वसाधारण सभेसमोर हा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.