जावली | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकताच राज्य सरकारने मार्च- एप्रिल व डिसेंबर 2020 या महिन्यामध्ये कार्यकाळ संपनाऱ्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला असून त्याचा सर्वाधिकार त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहेत त्यामुळे अशा निर्णयाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जावली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून अशा निवेदनचे पत्र जावली तालुक्याचे गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांना देण्यात आले आहे.
या वेळी रिपाइंचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे, भाजपचे जावली तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, रासपचे विलास शिंदे, रिपाइंचे तालुका संघटक संजय कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
आज गावांच्या विकासाचे केंद्र असलेल्या ग्रामपंचायतीवर स्वतःच्या मर्जीचा प्रशासक नेमून लोकशाहीला एक प्रकारे सुरुंग लावण्याचे काम राज्य सरकार कडून चालले असून ही लोकशाहीची जाहिर हत्या आहे, असे रिपाइंचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री हे एका राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी असतात त्यामुळे ते स्वतःच्या पक्षांच्या विचारधारेचे काम करतात प्रसंगी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना अधिक संधी व बळ देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या मर्जीच्या व्यक्तीला प्रशासक म्हणून नेमून गावचे पुढील राजकारण स्वतःच्या हातात कसे येईल व आपल्या पक्षाला त्याचा जास्तीतजास्त फायदा कसा होईल असे पाहिले जाईल.
दरम्यान, कोरोनाच्या भयंकर काळामद्ये महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावांसाठी अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या मधून लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरपंचांना किंवा त्यातीलच सदस्यांना प्रशासक म्हणून पुढील काही महिने पुन्हा एकदा जबाबदारी द्यावी अशी मागणी रिपाई जावली तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.