निर्भीडसत्ता न्यूज – ( प्रशांत साळुंखे )
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर दत्ता साने यांनी लागलीच सत्ताधारी भाजपावर तोफ डागायला सुरवात केली आहे. त्यामुळे भाजपनेही त्यांच्यावर पलटवार केला आहे. या आरोप प्रत्यारोपांमुळे शहरातील राजकारणाला रंग चढत आहे. भाजपाला सोडणार नाही, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपावर भ्रष्टाचराचे आरोप करण्यात येत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे दुर्दैवी असल्याचे महापालिकेतील सत्ताधारी पक्षनेते एकनाथ पवार यांनी म्हटले आहे.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते असतानाही योगेश बहल यांच्याकडून सत्ताधारी भाजपाला कोंडीत पकडण्यात येत नाही, असा आरोप त्यांच्या स्वपक्षियांकडून होत होते. त्यामुळे विरोधी पक्षनेता म्हणून बहल यांच्या कार्यशैलीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्यांच्या मवाळ भूमिकेबाबत स्वपक्षियांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याही मर्यादा वेळोवेळी स्पष्ट झाल्या. त्यामुळे महापालिकेचे सभागृह दणाणून सोडणारा विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी होती. अजित पवार यांनी त्याबाबत निर्णय घेतला आणि दत्ता साने यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली. निवडीचा सत्कार स्वीकारतानाच दत्ता साने यांनी भाजपावर वार केले. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेवेळी सभागृह गाजणार असे स्पष्ट होत आहे. असे असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार झाल्याचे भाजपाने मतदारांच्या आणि शहरवासीयांच्या मनावर ठसवले. भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी माहिती अधिकार आणि पत्र प्रपंच करून राष्ट्रवादीला जेरीस आणले होते. राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्यात भाजपाला यश आले. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. त्यानंतर राष्ट्रवादी मात्र सावरलेली नाही. अजूनही भाजपाचे पदाधिकारी पत्र प्रपंचात पुढेच असल्याचे दिसून येते. निर्णय घेण्याबाबतही भाजपा आघाडीवर आहे. विकासकामे पूर्ण करण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येते. एम्पायर इस्टेट येथील संत मदर तेरेसा उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नसतानाही त्यांनी त्याच्या उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली. अन्य प्रकल्प पूर्ण करण्याबाबतही त्यांच्याकडून प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. हे सर्व करताना राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. मात्र असे करताना त्यात सातत्य आणि एकवाक्यता दिसून येत नाही. केवळ पत्रकार परिषद घेऊन आरोप होत असल्याचे दिसून येते. विशिष्ट प्रकरण किंवा विकासकामांबाबत पाठपुरावा करून आणि त्याबाबत सखोल माहिती घेऊन त्याचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास केल्याचे या आरोपांतून दिसून येत नाही. त्यामुळे या आरोपांत किती तथ्य आहे, याबाबत साशंकता उपस्थित होते. नेमका याचाच फायदा भाजपाकडून घेण्यात येत आहे. ‘पारदर्शक कारभारा’चा ढोल अजूनही त्यांच्याकडून बडविण्यात येत आहे. राष्ट्रवादीने सत्ता काळात मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे त्यांना भ्रष्टाचाराबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपामधील हा आरोप आणि प्रत्यारोपांचा ‘सिलसिला’ सुरूच राहणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून दत्ता साने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाला नेमके कसे कोंडीत पकडतात यावरून या ‘राजकीय नाट्यात’ रंगत येणार आहे.