निर्भीडसत्ता न्यूज –
भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन येत्या काही दिवसातच करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे भामा आसखेड योजनेचा तिढा अखेर सुटण्याची शक्यता आहे. या योजनेचे काम सुरू करण्यास ग्रामस्थांनी सहमती दर्शविली असून आजपासून या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
भामा आसखेड प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, आमदार शरद गोरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भामा आसखेड धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पुणे शहराला पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. यामुळे शहराच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने मागील काही महिन्यांपासून भामा आसखेड योजनेचे काम बंद आहे. जमिनीच्या बदल्यात जमिन मिळाली पाहिजे, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. मात्र या प्रकल्पासाठीचे लाभक्षेत्र शिल्लक नसल्याने जमिन देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडून मान्य केली जात नव्हती. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. याप्रश्नी अनेक वेळा बैठका झाल्या आहेत.
शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये 388 प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसनासाठी जमिन देण्याची प्रक्रिया येत्या 20 दिवसामध्ये सुरु करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 20 ग्रामस्थांना रोख स्वरुपात मोबदला देण्यात येणार आहे. येत्या 20 दिवसात ही प्रक्रिया पुर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी काम सुरु करण्यास हिरवा कंदिल दिला आहे. भामा आसखेड धरणातून शहराला सुमारे अडीच टीएमसी इतके पाणी मिळणार आहे. शहराच्या पूर्व भागातील सुमारे 14 लाख नागरिकांना या प्रकल्पामुळे पाणी मिळणार आहे. 2014 साली याप्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. जुलै 2017 मध्येच हा प्रकल्प पुर्ण होणे अपेक्षित होते. यानंतर अनेकवेळा प्रकल्पाचे काम बंद पाडण्यात आले होते. प्रकल्पग्रस्थांचे पुर्नवसन योग्य पध्दतीने होत नसल्यामुळे काम बंद पाडण्यात आले होते.