निर्भीडसत्ता न्यूज –
विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावे, या हेतूने दरवर्षी दहावी व बारावी वेळापत्रक लवकर जाहीर करतात. विद्यार्थी ज्या उत्सुकतेने ज्या वेळापत्रकाची वाट बघतात त्यांची उत्सुकता आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०१९ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले आहे.
या वेळापत्रकानुसार, इयत्ता १० वी ची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात येणार असून १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीत घेण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत या परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा, तोंडी व अन्य परीक्षांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळांना कळवण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचं व दिवसाचे नियोजन करता यावे, यासाठी मंडळाकडून परीक्षांची तारीख लवकर जाहीर करणार, असा निर्णय मंडळाने घेतला होता. तसेच शाळा आणि महाविद्यालयांना संपूर्ण वेळापत्रक लवकरच पाठवण्यात येईल असेही मंडळाकडून सांगण्यात आले आहे. मात्र,यावर्षीही तारखा उशिरानेच जाहीर झाल्या. यंदाही शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी ही तारीख जाहीर करण्यात आली आहे.
सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जाहीर झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाने केले आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर पाहता येईल.
वेळापत्रकाबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरुपात पाठवाव्यात असे आवाहन मंडळाने केले आहे. यावर्षी मंडळाने पुनरावृत्त्यांसाठी जुने अभ्यासक्रमानुसार एक स्वतंत्र वेळपत्रक जाहीर केले आहे. मंडळ वर्षामध्ये दोनदा परीक्षा घेत असून मुख्य परीक्षेसाठी बारावीचे १७ लाख तर दहावीचे १४ लाख विद्यार्थी उपस्थित असतात. पूरक परीक्षेसाठी दहावी व बारावीचे एकूण ६ लाख विद्यार्थी अपेक्षित आहे. राज्यात सुमारे एकवीस हजार (एसएससी) आणि सात हजार (एचएससी) उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालय आहे.