महायुतीमध्ये विश्वासात घेतले जात नसल्याने आंबेडकरी संघटनांचा एकमताने निर्णय
सातारा | निर्भीडसत्ता न्यूज
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय-आठवले) पक्षाची देशात आणि राज्यात भाजपाबरोबर युती आहे. युती असतानाही सातारा जिल्ह्यातील कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आदी निवडणुकीत काही ठिकाणी राखीव जागा असतानाही आरपीआयला एकही जागा देण्यात आलेली नाही. साधे विचारातही घेतले गेले नाही. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडीत इतर महायुतीतील नवीन आलेल्या घटकपक्षाला जागा देण्यात आल्या. मात्र, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. तालुक्यातील कोणत्याही शासकीय समितीवर आरपीआयच्या पदाधिकार्यांना घेतले जात नाही. आरपीआयला सातत्याने डावलण्यात येत असल्याने जावली येथे भाजपाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय पदाधिकार्यांनी घेतला आहे. भाजपाला मतदान न करण्याचा ठराव मेढा येथे झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
मागील लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण देशातून केवळ साताराची जागा आरपीआयला देण्यात आली. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाने आरपीआयला सहकार्य केले नाही. आरपीआयचा एकमेव उमेदवार अशोकराव बापू गायकवाड यांना निवडणुकीत भाजपाने मतदान केले नाही. केवळ इतर मतदारसंघात आरपीआयची दलित मते घेण्याचा व स्वतःची मते आरपीआयला न देण्याचा अप्रत्यक्ष फॉर्मुला भाजपाने वापरला. त्यामुळे संपूर्ण देशात मोदीची लाट असूनही साताराची एकमेव जागा आरपीआयला गमवावी लागली. तर, या लोकसभा निवडणुकीत आरपीआयला एकही जागा दिलेली नाही.
आम्ही केवळ भाजपाला मतदान करण्यासाठी व त्यांनाच निवडून देण्यासाठी महायुती करायची का? कोणत्याही साध्या बैठकीस आरपीआयला सन्मानपूर्वक निमंत्रण दिले जात नाही. महायुतीत राहून आरपीआयला योग्य सन्मान आणि न्याय मिळणार नाही. सत्तेत वाटा मिळत नाही. मतदानापुरते घटकपक्षाला गृहीत धरणार असाल तर, असली युती काय कामाची ? असे अनेक प्रश्न बैठकीत पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. भाजपाच्या या स्वार्थी वृत्तीवर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.
जाती धर्माच्या नावाने देशात निर्माण झालेले अराजकता, धुळीला मिळालेला शेतकरी, वंचित, शोषित, पीडित, गरीब लोकांची झालेली वाताहात, पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामुळे सामान्य माणसांच्या मनात सरकारविषयी निर्माण झालेली चीड आणि असंतोष, प्रचंड महागाई, वाढती बेरोजगारी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बंद झालेली शिष्यवृत्ती, रसातळाला गेलेली देशाची अर्थव्यवस्था या सर्व गोष्टींना भाजप सरकार जबाबदार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून जावली तालुक्यातील तमाम आरपीआयच्या भीमसैनिकांनी व पदाधिकार्यांनी येथून पुढे भाजपाला कोणत्याही निवडणुकीत सहकार्य किंवा मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
जावली तालुक्यात आंबेडकरी संघटनेकडे स्वतः निवडून येण्याएवढे मतदान नाही. तरी कुणाला निवडून आणायचे व कुणाला पाडायचे, एवढे निर्णायक मतदान मात्र नक्कीच आंबेडकरी संघटनेकडे आहे. त्याची ताकद लोकसभा, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत नक्कीच बघायला मिळेल, असा इशारा पदाधिकार्यांनी दिला आहे. या बैठकीस जावली तालुक्यातील तमाम आंबेडकरवादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंबेडकरी संघटना आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविणार
स्वाभिमानाने घटक पक्षाला सोबत घेणार नसाल तर, येथून पुढे वेगळा विचार केला जाईल. जावली तालुक्यातील गावागावात जाऊन भाजपाच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यात येईल. दलित आंबेडकरी संघटना आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवून देईल. आंबेडकरी, वंचित, मुस्लिम, ओबीसी समाजाला एक करून त्या समाजाचे मत विभाजन न करता महाविकास आघाडीला सहकार्य करायचे निर्णय घेण्याचा अधिकार आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाईल, असा इशारा आरपीआयचे जावली तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे यांनी दिला आहे.