निर्भीडसत्ता न्यूज –
राफेल विमानाच्या खरेदीत कोणाताही घोटाळा झाला नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही काँग्रेसकडून या प्रकरणाचे राजकारण केले जात असून, न्यायव्यवस्थेचा अवमान सुरू आहे. या मुद्द्यावर काँग्रेस संसदेत चर्चा करत नाही. दुसरीकडे न्यायालयाने दिलेला निकालही काँग्रेसला मान्य नाही. विमानाच्या दरावरूनही काँग्रेस जनतेचा बुद्धीभेद करत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शुक्रवारी (दि. २१) पत्रकार परिषदेत केला.
भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक नामदेव ढाके, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, संजवनी पांडे आदी या वेळी उपस्थित होते.
विश्वास पाठक म्हणाले कि, काँग्रेसचे नेते राजकीय लाभासाठी गेल्या ७० वर्षांपासून देशातील जनतेला मूर्ख बनवण्याचा आणि दिशाभूल करत आहेत. राफेल विमानांची खरेदी करायची हे काँग्रेस सरकारनेच २०१२ मध्ये ठरवले होते. पण दलालीचा विषय निकालात निघत नसल्याने दोन्ही देशांमध्ये विमान खरेदीचा करार होत नव्हता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे स्वीकारताच राफेल विमान खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली. पंतप्रधान मोदी यांनी २०१५ मध्ये फ्रान्स देशाचा दौरा करून २०१६ मध्ये विमान खरेदीचा सामंजस्य करार करण्यात आला. विमान खरेदीचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने झाला आहे. या व्यवहारात कोणीही दलाल किंवा त्रयस्थ ठेवण्यात आलेला नाही. फ्रान्स सरकार आणि भारत सरकार यांच्यात हा करार झाला आहे. त्यामुळे विमानांची खरेदी ९ टक्के कमी दराने झाल्याचे फ्रान्सच्या द-सॉल्ट कंपनीने देखील मान्य केले आहे.
दरम्यान, आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही राफेल विमान खरेदीत घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खरेदी प्रक्रिया पारदर्शक झाल्याचेही न्यायालयाने मान्य केले आहे. राफेल विमान खरेदीत काँग्रेसला आलेले अपयश झाकण्यासाठी आता त्यांचे नेते राफेल कराराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काँग्रेसचे नेते राजकीय लाभापोटी राफेल विमान खरेदीबाबत आरोप आणि टिका करत आहेत. त्यातून देशातील राजकीय वातावरण गढूळ करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. नागरिकांमध्ये बुद्धीभेद निर्माण करण्याचा काँग्रेसचा हेतू आहे. परंतु, देशातील जनता हुशार असून, काँग्रेसच्या या कुटिल राजकारणाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.