पाचगणी – केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण 2018′ व “स्वच्छ सर्वेक्षण 2019′ या दोन्ही वर्षात महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिकेने उल्लेखनीय केलेल्या कार्याचा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वित्तमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर, नगरविकास प्रधानसचिव मनीषा म्हैसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जमशेद भाभा थिएटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथील कार्यक्रमात महाबळेश्वर नगरीच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली कुमार शिंदे यांनी महाबळेश्वरकरांच्या वतीने तर पाचणगीकरांच्यावतीने नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महाबळेश्वर पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगरसेवक कुमार शिंदे नगरसेविका शारदा ढाणक, अफ्रिन वारुणकर तर पाचगणी पालिकेच्या सुलभा लोखंडे, उज्ज्वला महाडिक, प्रवीण बोधे, दिलावर बागवान आदी उपस्थित होते. या दोन्ही पालिकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामध्ये घनकचरा प्रकल्प, ई टॉयलेट्स, नॅपकिन व्हेंडिंग मशीन, याच बरोबर घरोघरी डस्टबीन च्या माध्यमातून कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची पांचगणीकरांना लावलेली सवय, या सर्वाचे फलित म्हणजे हा पुरस्कार आहे.