निर्भीडसत्ता न्यूज –
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेकांचा बळी गेला. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली असून, दुचाकी व चारचाकी गाड्या वाहून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेमुळे आपल्याला अतीव दुःख झाल्याचे म्हटले आहे. पावसाच्या पाण्यामुळे जे मृत पावले आहेत, त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर पूरग्रस्त भागातील लोकांना राज्य सरकार आणि पुण्याचे जिल्हा प्रशासन, महापालिका सर्वोतोपरी मदत करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि नियंत्रण कक्ष सातत्याने पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका यांच्या संपर्कात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) दोन टीम आणि बारामतीमध्येही दोन टीम दाखल झाल्या आहेत. बारामतीमध्ये अजून एक टीम दाखल होते आहे. या भागातील धरणांच्या विसर्गावरही राज्य सरकार लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.