निर्भीडसत्ता न्यूज –
मुसळधार पावसामुळे जांभुळवाडी भागातील कोळवडी परिसरात मोटारीसह वाहून गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा मृतदेह शुक्रवारी सापडला. नऱ्हे भागातील मानाजीनगर भागात ओढय़ात वाहून गेलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून शहरात आलेल्या पुराच्या बळींची संख्या १९ झाली आहे.
जांभुळवाडी दरी पुलाजवळ कोळेवाडीतील रस्त्यावर बुधवारी रात्री ओढय़ाला पूर आला होता. खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना दुचाकी लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यावेळी मोटारीतून निखिल दिनेश चव्हाण (वय २१), साईनाथ उर्फ गणेश तुकाराम शिंदे (२२), सूरज संदीप वाडकर (२०, तिघे रा. संतोषनगर, कात्रज) तेथून जात होते. गावकऱ्यांनी त्यांना या रस्त्यावरून जाण्यास मनाई केली. मात्र, त्यांनी मोटार छोटय़ा पुलावरून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाण्याचा लोंढय़ात मोटारीसह चव्हाण, शिंदे आणि वाडकर वाहून गेले. बेपत्ता झालेल्या तिघांपैकी वाडकरचा मृतदेह जांभुळवाडीतील तलावात शुक्रवारी पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला सापडला. दरम्यान, शुक्रवारी नऱ्हे भागातील ओढय़ात आणखी एका युवकाचा मृतदेह सापडला.
मुकेश हरिदास गाडीलोहार (२८, रा. नऱ्हे) असे त्यांचे नाव आहे. पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख सुजित पाटील आणि अधिकारी विजय पाटील यांच्या पथकाने शोधमोहीम राबवली.
खेड शिवापूर येथील दग्र्याच्या परिसरात पाच जण वाहून गेले. खेड शिवापूर भागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
हवेली तालुका परिसरात आणखी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मच्छिंद्र पांडुरंग बनवले (४०), सुमन आजिनाथ शिंदे (६५), सुवर्णा रामचंद्र जाधव, धर्मनाथ मातादीन भारती प्रसाद (२५,रा. कोंढवा) यांचे मृतदेह गुरुवारी सायंकाळी सापडले. पुरंदर तालुक्यात गजराबाई सुदाम खोमणे (७०), गौरी शाम सूर्यवंशी (१५), साईनाथ सोपान भालेराव (२०) यांचे मृतदेह सापडले.
चंद्रकांत पाटील यांना घेराव
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील शुक्रवारी पूरस्थितीतीची पाहणी करण्यासाठी आले असता अरणेश्वर येथील टांगेवाले वसाहत येथे त्यांना संतप्त महिलांनी घेराव घातला. पाटील केवळ छायाचित्र काढून घेण्यासाठी आले असल्याची प्रतिक्रिया नोंदवत येथील नागरिकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मात्र, अशा पद्धतीने निदर्शने झाली नसल्याचा दावा करून मदत कार्यामध्ये राजकारण केले जात असल्याचे पाटील यांनी सांगितले.