निर्भीडसत्ता न्यूज –
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुडमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पक्कं झालं आहे. मात्र, कोथरूडची यंदाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी पक्की झाली आणि भाजपात धुसफूस सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्याचं सांगण्यात येत आहे तर इतर इच्छुक नाराज असले तरी तसं ते दाखवत नाही आहेत.
पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमध्ये जशी नाराजी आहे तशीच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतही यामुळे खदखद आहे. कोथरूडचे माजी शिवेसेना आमदार चंद्रकांत मोकाटे अपक्ष म्हणून शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने ही जागा मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचला दिली आहे. यामुळे शेट्टी विरुद्ध पाटील अशी पुरेपूर कोल्हापूर कुस्ती कोथरूडमध्ये रंगणार याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राजू शेट्टींनी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांना प्रस्ताव दिला आहे. चौधरी यांना उमेदवारी देण्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. तिकडे मनसेचे किशोर शिंदे, आपचे अभिजित मोरेदेखील विधानसभेच्या तयारीत आहेत. कदाचित सर्व विरोधक एकत्र येऊन चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात एकच उमेदवार देणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोथरूडमधून भाजपला शह देण्यासाठी विरोधक मास्टर प्लान तयार करत आहेत असं म्हणायला हरकत नाही.
चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला ब्राह्मण महासंघानेही विरोध केला आहे. कोल्हापूरमधील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तीला पुण्यातील ब्राह्मण समाज विरोध करणार, अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी घेतली आहे.
‘पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपच्या बरोबर राहिला आहे. असं असून सुद्धा कोल्हापूर येथील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणार्या, दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणार्या पुण्याबाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार,’ असं म्हणत आनंद दवे यांनी चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका केली आहे.
‘जातीचं राजकारण करून आरक्षणाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणार्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. गरज पडलीच तर ब्राह्मण महासंघाकडून उमेदवारसुद्धा उभे करू,’ अशी आक्रमक भूमिका आनंद दवे यांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी घोषित होण्याआधीच चंद्रकांत पाटील अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाली आहे.