संपूर्ण शहरास पुरेसे पाणी मिळावे म्हणून प्रशासनाचा उपाययोजना; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती
निर्भीडसत्ता न्यूज | प्रतिनिधी
संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराला सम व योग्य प्रमाणात पाणी मिळावे म्हणून शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी पुढील दोन महिन्यांसाठी केली जाणार असून, त्यास सोमवार (दि.25) पासून सुरूवात होणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी (दि.19) पत्रकार परिषदेत सांगितले.
पालिकेचे सर्व गटनेते, महापौर, पदाधिकारी व प्रमुख नगरसेवक, अधिकारी यांची बैठक मंगळवारी झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आयुक्तांनी ही माहिती दिली.
आयुक्त म्हणाले की, शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर उपाययोजनेसाठी पालिका प्रशासनाने विविध निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये शहरात पुन्हा दिवसाआड पुरवठा केला जाणार आहे.
पाण्याचा पुर्नवापर व पुर्नशुद्धीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया केलेले पाणी वापरासाठी नियोजन केले जात आहे. आंद्रा व भामा-आसखेड धरण पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी विशेष विभाग सुरू करून कामास चालना दिली जाणार आहे. शहराचे टोक व उंच भागात पाणी मिळण्यासाठी नव्या जलवाहिन्या व टाक्या बांधण्याचे नियोजन आहे. पाण्यासंदर्भात समिती स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून, तो लवकरच पालिका सभेसमोर ठेवला जाणार आहे. दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या 2 महिन्यांच्या कालावधीत पाणीपुरवठा विभागाने 40 टक्के गळती रोखणे, पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. कामात सुधारणा न केल्यास संबंधित प्लंबर, व्हॉलमन, उपअभियंता, अभियंता प्रसंगी कार्यकारी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
अनधिकृत नळजोड अधिकृत करणार
नळजोड अधिकृत करून घेण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. त्यामुळे पालिका स्वत: शोध घेऊन ते नळजोड अधिकृत करणार आहे. त्यासाठीचे शुल्क आणि दंड संबंधितांकडून सक्तीने वसुल केले जाईल. आवश्यकता असल्यास 4 ते 5 हप्ते ठरवून दिले जातील. बिल न भरण्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच, एक अधिकृत व दुसरे चोरून नळजोड घेतला जातो. दुसरा नळजोड खंडित करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तर, हॉटेल, वॉशिंग सेंटर, बांधकाम व्यावसायिक या अनधिकृत व्यापारी नळजोडवर तसेच, पालिकेच्या जलवाहिनीतून पाणी भरणार्या खासगी टँकरचालकांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. तसेच, थेट नळजोडीस विद्युत मोटार लावून पाणी खेचणार्या नागरिकांचे मोटार जप्त केली जातील. पाणी घेण्यासाठी तळमजल्यावर टाकी बांधण्यासाठी नागरिकांना 15 दिवसांची मुदत आहे, असे आयुक्तांनी सांगितले. महिला पोलिस, पोलिस, होमगार्ड घेून शहरात ही कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
वीज दरानुसार पाण्याचे दर असणार
प्रती दिनी दरडोई 135 लिटर पाणी पालिका उपलब्ध करून देत आहे. त्यानुसार 4 सदस्यांच्या कुटुबांसाठी पालिका 500 लिटर पाणी देते. मात्र, पालिकेचे पाणी स्वस्त असल्याने अनेक भागांत प्रमाणापेक्षा अधिक पाणी वापरले जाते. ते रोखण्यासाठी महावितरणाच्या वीजेप्रमाणे अधिक पाणी वापरणार्यांना बाजारभावानुसार पाण्याचा दर आकारला जाणार आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव पालिका सभेपुढे ठेवला जाणार आहे. मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.