निर्भीडसत्ता न्यूज |
चिखलीतील गायरान जमिनीवर जल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. त्यासाठी 1 हजार एक526 झाडे कापली जाणार आहेत. तर, 227 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. त्यास शनिवारी वृक्ष प्राधिकरण समिती सभेने चर्चे विना मंजुरी दिली आहे.
सभेला अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शीतल शिंदे, शाम लांडे, नवनाथ जगताप, सदस्य संभाजी बारणे, उद्यान विभागाचे मुख्य मुख्य अधीक्षक सुरेश साळुंखे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र लडकत आणि अधिकारी उपस्थित होते.
एकूण 300 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र चिखलीतील बग वस्ती येथील सुमारे 8 हेक्टर गायरान जागेत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी करण्यात येणार्या बांधकामासाठी तेथील झाडे हटविण्याची मागणी पाणीपुरवठा विभागाने उद्यान विभागाकडे केली. त्याकरीता तेथील दीड हजार पेक्षा अधिक झाडे कापावी लागणार आहेत.
त्यामध्ये सागवान 83, सागवाण 38, चिंच 22, तारूळ 12, पेल्टोफोरम 13, करंज 13, कांचन 19, पिंपळ 22 या 227 झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. तर, निलगिरी 251, काटेरी बाभुळ 21, खैर 43, सुबाभुळ 84, ग्लेरीसिरिया 1,127 असे एकूण 1 हजार 526 झाडू पूर्णपणे काढून टाकली जाणार आहेत.
पाणीपुरवठा विभागाच्या या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. सदस्य संभाजी बारणे यांनी पुनर्रोपण करण्यात येत असलेली 227 झाडे कोठे लावणार, असा सवाल केला. खरच इतकी झाडे तोडण्याची गरज आहे. गरज नसल्यास झाडे तोडू नयेत, अशी सूचना त्यांनी केली.
मात्र, प्रशासनाकडून चिखली जलशुद्धीकरण केंद्राचा विषय महत्वाचा असून, वृक्ष तोडीस मंजुरी द्यावी, असा आग्रह धरण्यात आला. त्यामुळे सदस्यांनी वृक्ष तोडीस विरोध केला नाही, असे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी सांगितले की, ती टप्प्यात वृक्ष तोडण्यास पुनर्रोपणास परवानगी दिली आहे. शुद्धीकरणाच्या पहिल्या टप्यातील कामासाठी आवश्यक झाडे आता तोडली जातील आणि पुनर्रोपण केली जातील.
पाण्यासाठी झाडांची कत्तल
सध्या शहराला 510 एमएलडी इतका दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. तरीही काही भागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची ओरड कायम आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी आंद्रा व भामा-आसखेड धरण पाणी योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. सुरूवातीला तेथे देहू बंधार्यातून आणलेल्या 100 एमएलडी पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाणार आहे. हा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी सत्ताधार्यासह पालिका प्रशासन आग्रही आहे. त्यामुळे झाडे तोडून शुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे.