निर्भीड सत्ता न्यूज
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.
२२ फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता.
दिल्लीत आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारी असणार आहेत. भाजपाने मात्र अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. दिल्लीच्या निवडणुकीत यावेळी सुधारित नागरिक्तव कायदा आणि जेएनयू हिंसाचार दोन महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. एकीकडे भाजपा आक्रमकतेने मुद्दे मांडत असताना आम आदमी पक्ष मात्र सांभाळून पावलं उचलत आहे.