निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरात राजरोसपणे अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 बीट निरिक्षकांवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाई केली आहे. या निरिक्षकांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपअभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे मीटर निरिक्षक सुर्यकांत फड, आरोग्य निरिक्षक राकेश सौदाई, मीटर निरिक्षक सिद्धार्थ जोगदंड, करसंकलन विभागाचे मुख्य लिपिक रवींद्र भाट, आरोग्य निरिक्षक सचिन जाधव, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे मुख्य लिपिक सदाशिव सुभेदार, मीटर निरिक्षक योगेश रानवडे, आरोग्य निरिक्षक भीमराव कांबळे, उद्यान विभागाचे लिपिक अविनाश गायकवाड, वॉयरलेस ऑपरेटर बी. के. पानमंद, विनायक शेवतीकर या बीट निरिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.
या अधिकार्यांवर अनधिकृत बांधकाम नियंत्रणासाठी बीट निरिक्षक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. बीट निरिक्षकांनी आपले दैनंदिन कामकाज सांभाळून हे अतिरिक्त काम करणे सक्तीचे करण्यात आले होते. याकडे दुर्लक्ष केल्याने या सर्वांकडून खुलासे मागविण्यात आले होते. सर्वाचे खुलासे समाधानकारक नसल्याने आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
उद्यान कामास दिरंगाईमुळे तीन अभियंत्यावर कारवाई
उद्यानाच्या कामास दिरंगाई केल्याने 3 अभियंत्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे, उपअभियंता सुनीलदत्त नरोटे व विजय जाधव असे त्या अधिकार्यांची नावे आहेत. केंद्र शासनाच्या अमृत अभियान योजनेत उद्यानाअंतर्गत बगीचा व ग्रीन स्पेसेस प्रकल्पाचे काम पालिकेने हाती घेतले होते. मात्र, या तीनही अधिकार्यांनी कामामध्ये विलंब करून दिरंगाई केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तसेच, त्याचे खुलासे समाधानकारक नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी त्यांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड केला आहे.
कामाच्या वेळेत झोपल्याने तीन मजुरांची वेतनवाढ रोखली
पाणीपुरवठा विभागाचे 3 मजूर आपल्या कामाच्या वेळेत झोपलेले आढळून आले. त्यामुळे त्याची एक वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली आहे. राजेंद्र मोरे, रवींद्र अहिरराव व आबाजी कातोरे असे त्या मजुरांची नावे आहेत. हे तिघे जण पाणीपुरवठा विभागाच्या मोरे वस्ती, चिखली, त्रिवेणीनगर, मोहननगर, या भागातील उंच टाकीत पाणी भरणे. टाक्यांचे व्हॉल्व्ह चालू व बंद करणे ही महत्वाचे कामे करतात. मात्र, ते रात्रीच्या वेळी झोपलेले असल्याचे वरिष्ठांना आढळून आले. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्था विस्कळीत होऊन त्या परिसरात अपुरा पाणीपुरवठा झाल्याने प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्या तिघांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. कामात कसुर केल्याने त्यांना प्रत्येकी 500 रूपयांचा दंड करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.