मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत हा लॉकडाऊन वाढवला होता. त्यानंतर आता पुढे लॉकडाऊन उठणार की कायम राहणार हा प्रश्न सर्वांसमोर आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन उठवण्याची सध्या स्थिती नसून लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊन सोबतच रुतलेल्या अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी ‘बिगीन अगेन’म्हणून हळूहळू सर्व व्यापार व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे लॉकडाउन असले तरी सर्व उद्योग व्यवसाय सुरू राहणार आहे असेही त्यांनी सांगितले.
सर्व धर्मीयांचे मी आज आभार मानतो आहे. कारण करोनाची शिमग्यानंतर बोंब सुरु आहे. त्यानंतर जे काही सण आले ते लोकांनी साजरे केले असं मी म्हणणार नाही. मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार त्यांनी सण साजरे केले. दहीहंडीचा उत्सव रद्द करण्यात आला. ईद साजरी करण्यात आली तीही घरच्या घरी आता गणेशोत्सव साजरा होणार आहे त्यात सार्वजनिक मंडळांनीही सरकारने घालून दिलेले निर्देश कोणत्याही अटी न घालता मान्य केले आहेत. त्यामुळे मी सर्वधर्मीयांचे आभार मी मानतो असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच विठूरायाच्या चरणी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून जाणार आहे आणि हे संकट दूर व्हावं म्हणून साकडं घालणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
गर्दी वाढली, केसेस वाढल्या तर नाईलाजाने लॉकडाउनचे कठोर नियम पुन्हा पाळावे लागतील. आज मी तुम्हालाच विचारतोय तुम्हाला पुन्हा लॉकडाउन हवाय का? जर नको असेल तर मास्क लावणं, हँड सॅनेटायझर वापरणं, हात धुत राहणं, गरज नसेल तर घराबाहेर न पडणं, उगाच गर्दी न करणं हे उपाय जर पाळले नाहीत तर नाईलाजाने लॉकडाउन पुन्हा करावा लागेल. तुम्हाला लॉकडाउन हवाय का? तुम्ही नियम पाळले नाही तर मात्र लॉकडाउन पुन्हा लागू करावा लागेल असेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.