मुंबई – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर असताना देखील मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग 19 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. करोनामुळे जगणे कठीण झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोदी सरकार विरोधात सोमवारी कॉंग्रेसने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात 29 जूनला सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळत दोन तास धरणे आंदोलन करत इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. हे आंदोलन नियम पाळून करण्यात येईल. याच दिवशी ऑनलाइन मोहीम सोशल मीडियावरही राबविली जाणार आहे. त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा 30 जून ते 4 जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करून केला जाणार आहे. या आंदोलनासाठी विभागनिहाय समन्वयक नियुक्त केले आहेत.
देशासमोर करोनाचे संकट असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीनसोबत युद्धजन्य परिस्थिती व पेट्रोल-डिझेलची दरवाढ या दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याविरोधात कॉंग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे. या आंदोलनास सर्वसामान्य जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल, असा विश्वासही कॉंग्रेस नेत्यांनी त्यांनी व्यक्त केला आहे.