पंचांगकर्त्यांचे जनतेला आवाहन
मुंबई : महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असताना पाण्याने आणि ओल्या रंगाने होळी साजरी करणं म्हणजे सामाजिक भान हरपणं होय. 23 मार्च रोजी होळी,24 मार्च रोजी धुलिवंदन आणि 28 मार्च रोजी रंगपंचमी आनंदात साजरी केली जाणार आहे. पण आपला आनंद हा इतरांच्या दुःखाचं कारण ठरू नये यासाठी सर्व पंचांगकर्त्यांनी सण साजरा करणाऱ्यांना आवाहन केले आहे.
राज्यात दुष्काळाच्या पाश्वभूमीवर तीव्र पाणीटंचाई असताना होळी व रंगपंचमी शास्त्रापुरतीच साजरी करण्याचे आवाहन पंचांगकर्त्यांनी केले आहे. कालनिर्णय, दाते पंचांग, जन्मभूमी पंचांग, महाराष्ट्रीय पंचांग व लाटकर पंचांग यांनी एकत्र येऊन होळीसंदर्भात आवाहन केले आहे. होळीचा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जवळपास सर्वच पंचांगकर्त्यांनी पुढाकार घेतला. वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा यासाठी होळी साजरी केली जाते. मात्र सध्या ही लहान स्वरूपात साजरी करणे आवश्यक आहे. प्रतिकात्मक पद्धतीने हे सण साजरे केल्यास लाखो लिटर पाण्याची बचत होईल, असे आवाहन या पंचांगकर्त्यांनी केले आहे. ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच जनावरेही तहानलेली आहेत. त्यामुळे अशा संकटकाळात धर्मशास्त्रामध्ये आवश्यक पूजा, कर्म, उत्सव थोडक्यात साजरे करण्यास सांगितले असून केवळ कपाळी टिळा लावून धर्मशास्त्रीयदृष्टया प्रतीकात्मक होळी, धूलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्यात यावी, असे या पंचांगकर्त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.