संविधान हा देशाचा कणा आहे, जो पर्यंत त्याचे पालन होईल तो पर्यंत देश विकासाची पाऊले चालेल…
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
चिखली येथील ज्ञान बाल विकास शिक्षण संस्था संचलित ज्ञानदा प्राथमिक विद्यालयात आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव एल.एस.कांबळे सर यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, महासचिव संतोष शिंदे, राज्य समनव्यक श्वेता ओव्हाळ या वेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान प्रास्ताविकेचे वाचन माने सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून संविधान दिनाचे महत्त्व सांगितले.
देशात लागू केलेले सर्व नियम आणि कायदे संविधानाने प्रदान केलेले असतात, त्यामुळे संविधानाचा आदर करणे आणि संविधानाने प्रदान केलेल्या नियम आणि कायद्यांचे पालन करणे, गरजेचे असते, असे न केल्यास देशाची अधोगती होऊ शकते, त्यामुळे देश टिकून ठेवायचा असेल तर, त्यासाठी संविधान महत्वाचे आहे.संविधानाने न केवळ देशाच्या प्रशासनाला, तर देशातील जनतेला देखील विविध अधिकार बहाल केले आहेत, ज्याच्या आधारे जनता आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावू शकते, सोबतच स्वतःच्या न्याय हक्कासाठी देखील लढू शकते.संविधान हा देशाचा कणा आहे. जो पर्यंत त्याचे पालन होईल, तो पर्यंत देश विकासाची पाऊले चालेल. असे मत रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने शाळेला संविधान प्रास्ताविक प्रतिमा भेट देऊन विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उमेश माने, मिलिंद चोरगे, दैवशाला चोले, मोहिनी चव्हाण, नाना शिंदे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कावळे यांनी केले. आभार शिंदे मॅडम यांनी मानले.