पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
समाजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी भारतीय संविधान महत्वाची भूमिका बजावत आहे. उज्ज्वल भवितव्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाची मूल्ये मनामनात रुजवली पाहिजेत, असा सूर ‘भारतीय संविधान आणि समाजकारण’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला.
भारतीय संविधान दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने पिंपरी चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील मैदानात प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. ‘भारतीय संविधान आणि समाजकारण’ या विषयावरील चर्चासत्र झाले. यामध्ये डॉ. बालाजी जाधव, राहुल कोसंबी, प्रा. डॉ. लोकेश कांबळे, अॅड. गौरव काकडे, संतोष गायकवाड सहभागी झाले होते. चर्चेत संविधानाची उद्देशिका, आर्थिक विकास, सामाजिक दर्जा, आरक्षण, न्याय, जातीव्यवस्था, संविधानाची मुल्ये, हरितक्रांती अशा विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
डॉ. बालाजी जाधव म्हणाले की, भारतात श्रीमंत व गरीबांमधील दरी मिटायला हवी. आर्थिकदृष्ट्या तुम्ही कितीही श्रीमंत झालात तरी सामाजिकदृष्ट्या तुम्ही श्रीमंत नाही. समाजाच्या डोळ्यावरील जातीभेदाचा चष्मा जोपर्यंत उतरणार नाही तोपर्यंत समाजाच्या दृष्टीने तुम्ही गरीबच आहात. डॉ. राहुल कोसंबी म्हणाले की, आरक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास होणे गरजेचे आहे. आरक्षण हे समाजाला प्रतिनिधीत्व करण्यासाठी दिले गेले होते. जागतिकीकरण, उदारीकरण व खासगीकरणामुळे आरक्षणाचे अवकाश संपायला लागले आहेत. त्याविरुद्ध आरक्षणाच्या लाभार्थ्यांसह मागणी करणार्यांनीही आवाज उठवला पाहिजे.
संतोष गायकवाड म्हणाले की, बराचसा समाज आजही शैक्षणिक क्षेत्रात प्रगत झालेला नाही. जोपर्यंत देशाचा शैक्षणिक स्तर वाढणार नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत संविधान पोहोचणे अवघड आहे. डॉ. लोकेश कांबळे म्हणाले की, भारतीय संविधानातील मूल्ये समाजाच्या उन्नतीसाठी महत्वपुर्ण आहेत. आरक्षण हा प्रतिनिधीत्वाचा मुद्दा असून त्याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे.
अॅड. गौरव काकडे म्हणाले की, न्यायालय आपले काम चोखपणे बजावत असल्याने नागरिकांच्या हक्क अधिकारांचे रक्षण होत आहे. स्वार्थासाठी कोणताही आधार घेऊन समाजात दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न झाल्यास समाजाने सजगपणे आपली भूमिका बजवावी. विजय गायकवाड यांनी सुत्रसंचालन केले.
दरम्यान, जागर संविधानाचा हा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम झाला. अशोक गायकवाड यांनी गझलगायन सादर करून रसिकांची मने जिंकली. सुप्रसिद्ध कव्वाल मुज्तबा नाझा यांनी बहारदार कव्वाली गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यानंतर गौरव संविधानाचा हा संगीतमय कार्यक्रम पार पडला.